रत्नागिरीतील सागर महोत्सवाचा पहिला टप्पा उत्साहात

    16-Jan-2023
Total Views |

sagar mohotsav


मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात सागरी मोहोत्सवाचा पहिला टप्पा दि. १३ आणि १४ जानेवारीला पार पडला. आसमंत बेनेवोलंस फौंडेशनने आयोजित केलेल्या या मोहोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंघ यांच्या हस्ते झाले. विविध आंतरराष्ट्रीय माहिती पटांच्या प्रसारणासोबतच तज्ञांनी व्याख्यानांमार्फत प्रेक्षकांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या सागरी महोत्सवाचे आयोजन केले गेले. हा महोत्सव दि.१३,१४ जानेवारी आणि २१,२२ जानेवारी अशा दोन टप्प्यात पार पडणार आहे. यातील पहिला टप्पा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पार पडला असून त्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय चित्रफितींचे प्रसारण केले गेले. याबरोबरच , ‘कासवे’ य विषयावर भाऊ काटदरे, ‘खारफुटीची जंगले’ या विषयावर लक्ष्मीकांत देशपांडे, ‘आंतरभारती क्षेत्रातील जैवविविधता’ या विषयावर अमृता भावे , ‘शाश्वत मासेमारी’ या विषयावर डॉ. केतन चौधरी, ‘मानवजातीच्या भविष्यासाठी महासागराचे महत्त्व’ या विषयावर डॉ. समीर डामरे आणि ‘स्थानिक पक्षी’ या विषयावर विराज आठल्ये या तज्ञांनी प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुहिता खेर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘सागर माझा सखा’ या विषयावर छायाचित्र प्रदर्शन ही आयोजित केले गेले होते.

रत्नागिरीतील सागर महोत्सवाचा दुसरा टप्पा २१ आणि २२ जानेवारी या दोन दिवसात होणार असून ‘कोस्टल कॉन्सवेशन फौंडेशन (CCF)’ यांच्या मार्फत तांत्रिक आधार घेऊन हा कार्यक्रम पार पडणार आहे. २१ आणि २२ जानेवारीला भाट्ये समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्प प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच, पुळणी आणि मांडवी किनाऱ्यांवर अभ्यास फेरी आयोजित केली आहे. तसेच, कार्ला येथेही बोटीतून खारफुटी अभ्यास फेरीचे आयोजन केले आहे. या सागर महोत्सवात सहभाग घेण्यासाठी www.aasmant.org या वेबसाईट वर जाऊ शकता. 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.