ठाणे: ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. शिवसेनेकडून ठाण्यात रोजगार मेळावा सुरू केलाय. बेरोजगारांकडे सरकारचं लक्ष नाही. तरुणांसाठी लढणारा कोणी दिसत नाही. तिथं शिवसेनेनं काम सुरू केलं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे. पक्षाचे काही पदाधिकारी नेमायचे होते. काही नवीन पदाधिकारी कामाला लागले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ठाण्यात रोजगार मेळावा सुरू करण्यात आला.
पुढे ते म्हणाले, "महाराष्ट्रात बेरोजगार वाढत चालले आहेत. देशातही बेरोजगार युवकांकडं कुणी लक्ष देत नाही. राजकीय पक्ष हे ५० वर्षांपूर्वी काय झालं? १०० वर्षांपूर्वी काय झालं? याकडं लक्ष देत आहेत. त्यासाठी भांडत बसले आहेत. तरुणांसाठी लढणारा किंवा पुढची ५० वर्षांसाठी लढणारा अजून दिसत नाही. तिथं शिवसेनेनं काम सुरू केलंय. पुण्यात विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एमपीएससीचे विद्यार्थी मोर्चे काढत आहेत. महिलांवर अत्याचार वाढत चालले. त्यांचा आवाज कुणी ऐकत नसल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं."
मुंबईतील ४०० किलोमीटरचे रस्ते किती वेळात करणार आहेत? ४०० कोटी रुपयांचे टेंडर काढायला प्रशासकाला अधिकार आहेत का? लोकप्रतिनिधी नसताना कुठल्या बॉडीनं याला मान्यता दिली? सहा हजार कोटी रुपयांचं बजेट कुठल्या फंडातून डायव्हर्ट केले? हे तुम्ही पुढच्या बजेटमध्ये दाखविणार आहात का? पाच कंपन्या आहेत, पाच पॅकेट कसे मिळाले? असे काही प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारले.