गुवाहाटी: बांगलादेश सीमेलगतच्या आसामचे पोलीस महानिरीक्षक ज्योती महंता यांनी राज्यातील विविध इस्लामी संस्थांच्या प्रमुखांची नुकतीच भेट घेत दहशतवादी मॉड्युलचा भांडाफोड करण्यासाठी सहकार्य करण्याचा आग्रह केला. ते म्हणाले की, मौलवींच्या रुपात दहशतवादी राज्यात लपलेले असून ते देशविरोधी कारवाया करत आहेत. दरम्यान, गेल्या काही आठवड्यांत पोलिसांनी ‘अल-कायदा’ भारतीय उपखंड आणि ‘अन्सारुल्लाह बांगला टीम’शी संबंधित काही दहशतवाद्यांची अटक केली होती. हे दहशतवादी मशिदी आणि मदरशांत इमाम अथवा मौलवी म्हणून काम करत होते.
गेल्या आठवड्यात बुधवारी अजमल हुसैन नावाच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आले होते. त्याला आसामची राजधानी गुवाहाटीतून पोलिसांनी अटक केले होते. अजमल एका मदरशात मौलवी होता, पण तो ’अल-कायदा’ आणि ‘अन्सारुल्लाह बांगला टीम’साठी काम करत होता.महंता म्हणाले की, ‘’राज्यात काही दहशतवादी मौलवी आणि इमामाच्या वेषात लपलेले असून आपल्या देशविरोधी कारवाया करत आहेत. आम्ही मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केली असून त्यात आतापर्यंत ३८ दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे.
“आज आम्ही राज्यातील इस्लामी संस्थांच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही दहशतवादी संघटनांच्या ‘मॉड्यूल’चा पर्दाफाश करू शकत नाही. आम्ही त्यांच्याकडे सहकार्याची आणि पाठिंब्याची मागणी केली आणि त्यांनी तसा विश्वास दिला,” असेही महंता यांनी सांगितले.दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील हिमंता बिस्व सरमा सरकारने राज्यातील तीन मदरशांना जमीनदोस्त केले होते. या मदरशांच्या वापर दहशतवादी कारवायांच्या केंद्राच्या रुपात होत होता. या मदरशांशी संबंधित कितीतरी मौलवींना पोलिसांनी अटक केली होती.हिमंता बिस्व सरमा यांनी याबाबत म्हटले होते की, राज्यातील ज्या कोणत्या संस्थेत शिक्षणाच्या नावावर दहशतवादी आणि जिहादी कारवाया केल्या जातील, त्यांना तोडले जाईल. त्याआधी त्यांनी मदरसे दहशतवादाची केंद्रे झाल्याचे आणि तिथे शिक्षणाऐवजी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे म्हटले होते.