सध्या असेच एक संशोधन चर्चेत असून सार्या माध्यमांचे लक्ष एका बातमीने वेधून घेतले आहे. ते म्हणजे अतिशय दुर्धर मानला जाणारा महिलांचा ‘गर्भाशय मुखाचा कॅन्सर.’ या भयंकर वेदनादायी आजारावर लस शोधण्यास संशोधकांना यश मिळाले असून औषध व लस संशोधनात देशात अग्रणी असलेल्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’ या संस्थेने हे लक्षणीय यश प्राप्त केले आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत असून केंद्र सरकारने त्वरित याबाबत दखल घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीची अंमलबजावणी हाती घेतली आहे. त्याविषयी सविस्तर...
कॅँँन्सर’ हे नुसते नाव जरी घेतले तरी मनाचा थरकाप उडतो. कुणाही व्यक्तीला कॅन्सर झाल्याचे नुसते समजले तरी ती बातमी ’वाईट’ समजली जाते. ज्याला कॅन्सर झाला आहे, त्याची अवस्था तर कल्पनेपलीकडे भयानक होते. नातेवाईक नैराश्यग्रस्त होतात. जवळच्या व्यक्ती तर हतबल होऊन बसतात. ही हतबलता, निराशा आणि दुःख पदरी येण्याचं कारणही तसंच आहे. ‘मेडिकल सायन्स’ इतकं प्रगत झालेलं असूनही ‘कॅन्सर’ या आजारावर मात्र अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाही.
जे उपचार उपलब्ध आहेत ते, ‘आजार बरा, पण उपाय नको’ इतके ते रुग्णाला भयंकर वाटतात. कर्करोगाची शंका येताच सुरुवातीला ‘पेटस्कॅन’ इ. अवघड तपासण्यांमधून जावे लागते. त्यातील शंका दूर होण्यासाठी ‘बायप्सी’ करायला सांगितली जाते. मनात धाकधूक घेऊन ‘बायप्सी’ पार पडल्यावर कर्करोगाचे निदान झाले की रुग्णाचे मनोबल पूर्ण खचते. जीव वाचवायचा उपाय म्हणून डॉक्टरांनी सांगितलेल्या ऑपरेशनला रुग्ण मनाचा हिय्या करून तयार होतो.
हे ऑपरेशन एकवेळ परवडले, पण त्यानंतरची ‘केमोथेरेपी’ इतकी भयंकर असते की, त्या मरणप्राय वेदना सहन करण्यापेक्षा मेलेले बरे, अशी रुग्णाची मनःस्थिती होते. शिवाय महागड्या ट्रीटमेंटमध्ये किती लाख खर्च होतात, ते मोजायलाच नको. अशाप्रकारे हरतर्हेने भयावह वाटणारा हा ’कर्करोग’ नावाचा आजार होऊच नये, म्हणून काही उपाय सापडला, तर किती बरे होईल, असा विचार साहजिकच मनात येतो. असा विचार आपल्या मनात येतो, त्यापूर्वीच तो आरोग्य क्षेत्रात काम करणार्या संशोधकांच्या मनात येऊन गेलेला असतो.
एखादे उपलब्ध नसलेले औषध शोधण्याचा ध्यास घेऊन संशोधन कार्य अखंड सुरू असते. त्यावर एकटादुकटा नव्हे, तर संशोधकांची अवघी एक टीमच या कामात बुडालेली असते. एका मागोमाग एक प्रयोग होत असतात आणि अखेरीस त्यातलाच एक प्रयोग शेवटी यशस्वी होतो. सध्या असेच एक संशोधन चर्चेत असून सार्या माध्यमांचे लक्ष एका बातमीने वेधून घेतले आहे. ते म्हणजे अतिशय दुर्धर मानला जाणारा महिलांचा ’गर्भाशय मुखाचा कॅन्सर.’ या भयंकर वेदनादायी आजारावर लस शोधण्यास संशोधकांना यश मिळाले असून औषध व लस संशोधनात देशात अग्रणी असलेल्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’ या संस्थेने हे लक्षणीय यश प्राप्त केले आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत असून केंद्र सरकारने त्वरित या बाबत दखल घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीची अंमलबजावणी हाती घेतली आहे.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्तनाच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कर्करोग आहे. ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः ४५ ते ६० वयोगटातील महिलांमध्ये हा आजार जास्त आढळतो.
कशी होते लागण?
गर्भाशयाच्या मुखावर ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’-‘एचपीव्ही’- या विषाणूद्वारे शरीरात या कर्करोगाची लागण सुरू होते. ’एचपीव्ही’ हा विषाणू अगदी नकळत आणि हळूहळू कार्यरत होतो. त्यामुळे हा आजार लवकर लक्षात येत नाही. शरीरात मूळ धरलेल्या या कर्करोगाचे निदान बर्याच पुढच्या स्टेजला पोहोचल्यावरच होते. अर्थातच उपचार पहिल्या स्टेजला न मिळाल्याने कर्करोग वेगाने बळावतो आणि अल्प काळातच रुग्ण दगावतो. खरे तर अगदी सुरुवातीच्या टप्प्यात निदान होऊन वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण बरा होऊ शकतो. पण प्रत्यक्षात तसे घडत मात्र नाही.
या आजारातले सत्य आणि वास्तव
भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे दीड लाख रुग्ण आढळून येतात. उशिरा निदान होत असल्याने २० ते २२ हजार रुग्णांना जीव गमवावा लागतो. मुख्य बाब म्हणजे, एका पाहणी अहवालातील निष्कर्षानुसार, आपल्या देशात भविष्यात या रोगाचा धोका अधिक वाढणार आहे. त्यातही आणखी काळजीची गोष्ट म्हणजे तरुण वयातच स्त्रियांना हा आजार गाठू शकतो. असे झाले तर तरुण स्तनदा माता किंवा विवाहानंतर माता होऊ इच्छिणार्या तरुणी यांच्याभोवती हा आजार घिरट्या घालू लागेल.
त्यातून अनेक कौटुंबिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतील. या पाहणीतली आकडेवारी धक्कादायक असून ४८ कोटी, ३५ लाख महिलांना हा कर्करोग घेरण्याचा संभव आहे. परिस्थितीचे हे गांभीर्य विचारात घेऊनच मुंबईतील ‘टाटा मेमोरिअल सेंटर’च्या शास्त्रज्ञांनी यावर उपाय शोधण्यासाठी अतिशय वेगाने संशोधन केले आहे.
कमी वेळात जास्त गतीने जसे संशोधन झाले, तसेच हा संशोधनखर्च कमी व्हावा आणि तपासणीचा खर्चही सामान्य रुग्णाला परवडेल असा राहावा, यादृष्टीने या आजाराची तपासणी आणि निदान कमी खर्चात साध्य होईल, असे तंत्र जाणीवपूर्वक विकसित करण्यात आले. म्हणून भारतासारख्या विकसनशील देशात गरीब रुग्णांना अगदी सुरुवातीच्या टप्प्यातले उपचार आर्थिकदृष्ट्यापरवडणारे झाले आहे.
या सर्व संशोधनाअंती आता गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी भारताने ही जी स्वतः लस विकसित केली आहे, तिची अधिकृत घोषणा नुकतीच ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्यावतीने करण्यात आली. येत्या काही महिन्यांतच ही लस ’राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम’ या योजनेत समाविष्ट होईल. सरकारी धोरणानुसार, तिची किंमत २०० ते ४०० रुपये इतकीच ठेवण्यात येईल, जी प्रत्यक्षात बरीच महाग आहे.
जगात आतापर्यंत फक्त दोन कंपन्यांकडे हा आजार रोखण्यासाठी लस उपलब्ध होती. पण, आता ‘टाटा हॉस्पिटल’चा ‘बायोटेक्नॉलॉजी’ विभाग आणि ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संशोधन संस्थेच्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांना हे फार मोठे यश प्राप्त झाले असून जगातल्या त्या देशांमध्ये आता भारताचे नाव नोंदवले गेले.
हे यश संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असून एका दुर्धर रोगावर आपल्या संशोधकांनी ’स्वदेशी’ लस तयार केली असल्याने जगाचे लक्ष भारताने आपल्याकडे वेधून घेतले आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाचा लाभ गरजू व गरीब स्त्रियांना सुलभतेने मिळावा यासाठीच ही लस ‘राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम’ यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रयोगातून ही लस प्रभावी असल्याचे दिसून आले असून टक्केवारीच सांगायची तर ९३ टक्क्यांपर्यंत हा आजार आपण थोपवू शकणार आहोत.
यासंबंधी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ’राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम’ ही योजना सरकारच्यावतीने निरंतर सुरू असते, अशी माहिती देऊन अनेक आजारांवरील परिणामकारक लस यापूर्वी ‘राष्ट्रीय लसीकरण’ कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आल्यामुळे त्याचा लाभ सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवता आला असल्याचे सांगितले आहे. आताही तसाच लाभ ही लस सहजपणे पोहोचल्यावर संबंधितांना होईल.
पुढील दोन वर्षांत या लसीचे २०० दशलक्ष डोस तयार केले जातील आणि त्याची किंमत बाजारातील इतर लसींपेक्षा कमी असेल. ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे ‘सीईओ’ अदार पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांत ही लस सर्वत्र उपलब्ध होईल आणि तिची किंमत २०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान इतकी कमी ठेवण्यास संबंधित मंत्रालयाशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच ही लस आता आधी वय वर्ष १० ते २६ या वयोगटातील युवती आणि महिलांना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असे ‘एम्स रुग्णालया’च्या स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. नीरजा बाटला यांनी सांगितले आहे.
सध्या ’गार्डासील’ व ’सर्व्हिरीक्स’ हे दोन प्रकारचे ‘व्हॅक्सीन’ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ‘व्हॅक्सीन’चे तीन डोस असतात. वयवर्ष ११ ते ४५ वयोगटातील महिलांना देण्याचे पहिल्या टप्प्यातील नियोजन आहे. अर्थात, हे ‘व्हॅक्सीन’ घेतले तरी त्याचा उपयोग व्यवस्थित होण्यासाठी त्यासोबत नियमितपणे शारीरिक तपासणी आणि ‘पॅप स्मिअर’ नावाची चाचणी करणे आवश्यक आहे. कारण, याच आजाराच्या अनुषंगाने गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग व बिजकोशाचा कर्करोग हे आजारही उद्भवू शकतात. उशिरा लग्न होणे, मूल न होणे किंवा उशिरा होणे, बाळाला स्तनपान न देणे यामुळे स्तनांचा तसेच गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग ५० ते ६५ या वयात होऊ शकतो.
ज्या महिलांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलता असते, अशा स्त्रियांना हा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टरांच्या शिफारशीने सोनोग्राफी, क्युरेटिंग या तपासण्यांच्या आधारे निदान करण्यात येते. सध्याच्या काळात नियमित तपासणी, जागरूकता, योग्य उपचार असतील, तर गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी...
भारतात हा रोग एवढ्या जास्त प्रमाणात का आढळतो, त्याची कारणेही या संशोधना दरम्यान शोधण्यात आली आहेत.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची कारणे
गरीब व कष्टकरी महिला आपल्या आरोग्याची हवी तशी काळजी घेत नाहीत, हे यामागील मुख्य कारण असून ‘सर्व्हिक्स’ हा अवयव गर्भाशयाच्या खाली स्थित असतो, जो स्त्रियांमधील शारीरिक बदल दर्शवित असतो. पण, याबद्दलचे अज्ञानच आजारास कारणीभूत होते. गर्भाशयाचा मुख कर्करोग मुख्यतः विषाणू संसर्गामुळे होतो. ’ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ या विषाणूच्या काही प्रजाती यास कारणीभूत ठरतात. प्रथम हा विषाणू एका विशिष्ट अवयवावर हल्ला करतो, ज्याला ’सर्व्हिसायटिस’ म्हणतात.
गर्भाशयाच्या मुखावर सूज येते. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर तो शरीरातून काढून टाकला जाऊ शकतो. परंतु, काहींच्यामध्ये याचा संसर्ग कायम राहतो, ज्याला ’क्रॉनिक सर्व्हिसायटिस’ म्हणतात.
अशा संसर्गाने १०-१५ वर्षांनंतर त्याचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते. हे संसर्ग होण्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. कर्करोेगाच्या प्राथमिक टप्प्याआधी पूर्व प्राथमिक अवस्था असते. या अवस्थेत निदान व उपचार करता आले, तर हा रोग पूर्णपणे टाळता येतो. साधारण ७० टक्के व्यक्तींमध्ये हा आजार विषाणूमुळे होतो. परंतु, ३० टक्के लोकांमध्ये त्याचे कारण अद्याप निश्चित असे उलगडलेले नाही. तरी, कारणांचा शोध घेऊन काही लक्षणे मात्र निश्चित करण्यात आली आहेत.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे
योनी मार्गातील स्राव, रक्तस्राव आणि ओटीपोटात वेदना होणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. बर्याचदा महिला अशा प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.
गर्भाशय मुखावरील पेशी जास्त वाढल्यास त्या बाजूच्या अवयवांपर्यंत पोहोचतात. सुरुवातीला आजाराची लक्षणे दिसत नाहीत. पण, आजार वाढल्यावर मात्र लक्षणं दिसायला लागतात.
धुम्रपान, तंबाखू इ. व्यसने असणार्या महिला, लहान वयातली लग्नं, वारंवार प्रसूती, गर्भनिरोधक गोळ्या जास्त काळ घेणे इत्यादी कारणेही आढळून आली आहेत.
साधारणपणे ४० ते ५० वयाच्या दरम्यान हा कर्करोग उग्र रूप धारण करतो, जो आधीपासूनच शरीरात डोके वर काढून बसलेला असतो.
कर्करोग लक्षात येण्यापूर्वी १० ते २० वर्ष त्याची शरीरात नकळत सुरुवात झालेली असते. कर्करोग जास्तच वाढला असेल तर तो इतर अवयवांपर्यंत पोहोचतो.
भूक न लागणे, वजन कमी होणे, थकवा येणे, ओटीपोटात दुखणे, कंबर, पाठ दुखणे, पाय सुजणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे, अशी लक्षणे ठळकपणे दिसून येतात.
अमृता खाकुर्डीकर