नवी दिल्ली : “ ‘नॅशनल हेराल्ड’ घोटाळ्याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी हे जामिनावर बाहेर आहेत. गांधी कुटुंबाच्या भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई आता निर्णायक वळणावर आली आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे काढण्यात येणारे ‘भारत जोडो आंदोलन’ हे प्रत्यक्षात ‘गांधी परिवार बचाओ आंदोलन’ आहे,” असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी शनिवारी (३ सप्टेंबर) पत्रकारपरिषदेत लगाविला.
“ ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत. नुकतेच या दोघांना तपास यंत्रणांनी चौकशीसाठी बोलावले असता काँग्रेसने यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आरोपी क्रमांक एक आणि दोन आहेत. चंद्रभानू गुप्ता यांनी त्यांच्या पुस्तकात ‘नॅशनल हेराल्ड’च्या निधीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढेच नाही, तर तपास यंत्रणांनी ‘हेराल्ड’च्या निधीची चौकशी केल्यास भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण समोर येईल,” असा दावाही चंद्रभानू गुप्ता यांनी केला होता. त्यामुळेच काँग्रेस पक्ष आता सैरभैर झाला असून त्यांच्यातर्फे सुरू करण्यात येणारे ‘भारत जोडो आंदोलन’ हे प्रत्यक्षात ‘गांधी परिवार बचाओ आंदोलन’ असल्याचे पात्रा यांनी म्हटले.
सोनियांनी गुलामगिरीचे चिन्ह परत का आणले?
भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाविषयी बोलताना पात्रा म्हणाले की, “भारतीय नौदलाच्या ध्वजावरील सेंट जॉर्जचे चिन्ह सर्वप्रथम अटल बिहारी वाजपेयी यांनी काढून टाकले होते. मात्र, त्यानंतर सोनिया गांधींच्या विनंतीवरून वसाहतवादी प्रतीक परत आणण्यात आले. आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिटिश चिन्ह काढून टाकले आहे. मात्र, सोनिया गांधी यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीचे चिन्ह परत का आणले होते याचे उत्तर काँग्रेसने द्यावे,” असेही पात्रा यांनी यावेळी नमूद केले.