आता बारावी पास विद्यार्थ्यांना मिळणार नोकरीसह पुढील शिक्षणाची हमी!
फडणवीस शिंदे सरकारची योजना! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रीया
23-Sep-2022
Total Views |
मुंबई: राज्य शासनाने राज्यातील कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला नोकरी व पुढील शिक्षणाची हमी देणारी येजना सुरू केली आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबिवण्यात येत असून या वर्षांत किमान १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेबरोबर ‘मिलाप ’ या योजनेचा सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, टाटा सामाजिक संस्थेच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या प्रमुख प्राचार्य मधुश्री शेखर, तानिया शॉ, विनीता कौशल आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या आधारावर नोकरी करता करता वेगवेगळय़ा क्षेत्रातील शिक्षण घेण्याची संधी मिळणार असून, त्यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून संबंधित विषयातील पदविका व पदवी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
आतापर्यंत ३४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. आता पुढच्या टप्प्यातील योजनेत मात्र कला, वाणिज्य विज्ञान अशा कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व नोकरीची हमी दिली जाणार आहे, अशी माहिती समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अॅग्रीकल्चर, ऑटोमोटिव्ह, चाईल्ड केअर, इलेक्ट्रॉनिक्स, मिडिया, इंचरटेनमेंट, लाईफ सायन्स, रिटेल मॅनेजमेंट, टय़ुरिझम अॅंड हॉस्पिटॅलिटी, आयटी, इत्यादी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता घेता नोकरीची संधी दिली जाणार आहे.