मुंबई : सांगली येथे घडलेल्या साधूंच्या मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारणाची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर आहेत. सांगलीच्या घटनेची माहिती समजताच तात्कळ महासंचालकांशी फोनवर बोलून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. तातडीने या प्रकारणाची चौकशी करून, लवकरात लवकर दोषींना अटक केली जावी असे निर्देश फडणवीसांनी दिले आहेत.
गावात शिरलेल्या साधूंना चोर समजून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील लवंगा या गावात घडली आहे. सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून गावकऱ्यांनी चारही साधूंना मारहाण केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून साधूंना नागरिकांच्या तावडीतून सोडवलं. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली. ही घटना मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी, दुपारच्या सुमारास घडली.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून चार साधू कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. कर्नाटक येथील देवदर्शन आटपून ते लवंगा मार्गे विजापूर येथे जात होते. दरम्यान रस्त्यात गाडी थांबवून विजापूर हा रस्ता कोणता आहे याबाबतची विचारणा एका विद्यार्थीनीस केली असता, मुलं चोरणारी टोळी समजून चारही साधूंना गाडीतून ओढून काठीनं, पट्ट्यानं मारहाण केली. संपूर्ण राज्यात या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लवकरच दोषींवर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.