मुंबई: गणेश विसर्जन दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार राडा झाला. यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. गुन्हे दाखल होताच शिवसेना आक्रमक झाली. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेकडे तक्रार करण्यापलीकडे फार काही उरलं नाही. ‘मातोश्री’च्या दुकानामध्ये बसून तक्रारीचं मार्केटिंग सुरू असल्याची खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.
नारायण राणे म्हणाले, "सदा सरवणकर माझे मित्र आहेत, काल जो प्रकार घडला, त्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या हेतूने आलोय. तक्रार दिलेय त्याची पोलीस चौकशी करतील. फायरिंग झालेय असं म्हणता, तर आवाज आला का? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला. सरवणकरांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचं मार्केटिंग करण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही. पण असले हल्ले-बिल्ले करु नका, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? परवानगी घ्यावी लागेल. पक्षाचा प्रश्न नाही, मित्र आहे म्हणून आलो. आमची युती आहे, युती धर्मानुसार एकमेकांच्या मागे दोघांची ताकद असतेच. ५० जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो, असंही राणेंनी सांगितले. आम्ही धांगडधिंग्याची दखल घेत नाही, नाहीतर त्यांचं चालणं फिरणं कठीण होईल. शिंदे गटच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतील, धनुष्यबाण चिन्हही त्यांनाच मिळणार, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.