मुंबई: राज्यात मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना आता लम्पी या आजाराने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. लम्पी या आजारावर राज्य शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. लम्पी आजाराबद्दल बरेचसे गैरसमज दूर करणे गरजेचे असल्याचंही ते म्हणाले.
"लम्पी आजारामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून त्यामुळे दूध व्यवसायावर परिणाम झाला आहे. हा आजार झालेल्या प्राण्यांचे दुधही शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे येत्या हंगामातील साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी लम्पी आजारावर आळा घालणे गरजेचं आहे. अशा प्राण्यांना विमा संरक्षण देण्यासाठीही उपाययोजना सरकारने कराव्यात. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे." असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, "देशपातळीवर पंजाब, हरियाणा, राजस्थान लम्पी स्किन आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसायाला अडचण निर्माण झाली आहे. जर वेळीच लसीकरण नाही झालं तर मात्र आजार वाढतो. मी पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी याबाबात बोललो आहे. या आजाराबाबत समज गैरसमज आहेत. याबाबत सरकारने जनजागृती करावी. म्हशीला हा आजार होत नाही. राज्य सरकारने याबाबत तत्काळ पाऊले उचलावीत. जर जनावरं दगावली तर मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होईल," असंही अजित पवार म्हणाले.
"त्या खात्याच्या मंत्र्यांनी प्रेस घेऊन मार्गदर्शन करावं. संकरित गाईमध्ये याचं प्रमाण जास्त आहे, असं ते म्हणाले. 16 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाने कधी सुरु करायचे याबाबत बैठक आहे. 1 ऑक्टोबरला कदाचित कारखाने सुरू होतील. यावेळी अनेक जनावरे येतील परिणामी आजार वाढेल. परदेशातून लसी मागवा. जनावरांना आजार होणारं नाही याची काळजी सरकारने घ्यावी," असं अजित पवार म्हणाले.