इम्तियाज जलील तुमच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा!

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी डागली तोफ

    06-Aug-2022
Total Views |
raosaheb danve  
 
 
 
औरंगाबाद  : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात आंदोलन आणि मोर्चा काढून औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे आधी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग शहराला औरंगाबाद म्हणा, असा खोचक टोला लगावत केंद्रीय मंत्री  रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागली.
 
 
महाविकास आघाडीचे सरकार शेवटच्या घटका मोजत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याचा निर्णय पारित केला होता. परंतु नियमानुसार जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव येत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते. त्यामुळे ठाकरे सरकारच्या नियम बाह्य निर्णयाला फडणवीस-शिंदे सरकारने सत्तेवर येताच,  छत्रपती संभाजीनगर  नामांतराचा  निर्णय पुन्हा एकदा पारित करून घेतला.
 
 
सोबतच उस्मानाबादचे धाराशिव व नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णयही घेतला. त्यामुळे  संभाजीनगरच्या नामांतराने इम्तियाज जलील यांचा पोटशूळ उठला  व एमआयएम या निर्णयाला  तीव्र विरोध दर्शवत रत्यावर उतरली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून औरंगाबादमधील राजकारण कमालीचे  तापले  आहे.
  
 
इम्तियाज जलील यांच्या कृतीचा खरपूस घेत दानवेंंनी “एमआयएमला माझा सवाल आहे की, तुम्हाला औरंगजेबबद्दल एवढं प्रेम का आहे? ज्यानं मराठवाड्यावर अन्याय केला, येथील लोकांना त्रास दिला, त्या औरंगजेबबद्दल तुम्हाला इतका पुळका येण्याचं कारण काय? असे खडे बोल सुनावले. तसेच सारा महाराष्ट्र जाणतो, औरंगजेब काय होता? दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेजण जाणतात. औरंगजेब नाव एवढं चांगलं असेल, तर तुम्ही आपल्या मुलाचं नाव औरंगजेब का ठेवत नाहीत?” असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला.
 
 
दरम्यान गुगुल मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' तर उस्मानाबाद जिल्ह्याचे 'धाराशिव' असा उल्लेख करण्यात आल्याने इम्तियाज जलील यांचा चांगलाच जळफळाट झाला होता. औरंगाबाद शहराचे नाव गुगलने कशाच्या आधारावर बदलले आहे, हे तुम्ही स्पष्ट करू शकता का?, तसेच ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा खोडसाळपणा करण्यात आला आहे, त्याचं गुगलने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जलील यांनी ट्विटरच्या माध्यमातून गुगलकडे केली आहे.
 
  
फडणवीस-शिंदे सरकारने मुख्यमंत्रांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव व नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित केला. आता या प्रस्तावाला केंद्राकडून हिरवा झेंडा मिळाल्यावर विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल.