मुंबई : देशातील सर्वात मोठी ग्राहकसंख्या असलेली दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची फाईव्ह जी सेवा दिवाळी पासून सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याबाबत घोषणा केली आहे. २०२३ पर्यंत रिलायन्स संपूर्ण देशभर फाईव्ह जी सेवा पुरवत असेल असेही त्यांनी सांगितले. या दिवाळीपासून देशातील महत्वाच्या महानगरांपासून रिलायन्सची फाईव्ह जी सेवेची सुरुवात करेल आणि हळू हळू संपूर्ण देशभर त्याचे जाळे विस्तारात जाईल.
रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहेच पण त्या कंपनीकडून सुरु केले जाणारे फाईव्ह जी नेटवर्क सेवा ही जगातील सर्वात मोठी फाईव्ह जी सेवा असणार आहे. कंपनीने यासाठी तब्बल २ लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. देशात सुरु होणारी फाईव्ह जी सेवा ही जरी अत्यंत फायदेशीर ठरणार असली तरी त्या सेवेच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच तज्ज्ञांकडून या सेवेच्या प्रतिसादाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. तरी या सर्वांवरही जिओ उत्तर शोधणार आहे. रिलायन्सने स्वस्त फाईव्ह जी मोबाईल फोन्ससाठी गुगलशी करार केला आहे. या करारातून स्वस्त फाईव्ह जी फोन्स ची निर्मिती केली जाणार आहे, वर्षाअखेरीपर्यंत हे फोन्स बाजारात येण्याची शक्यता आहे. या फोन्सची किंमत १० - १५ हजार रुपये असण्याची शक्यता आहे.
या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुकेश अंबानी यांनी आता आपल्या पुढच्या पिढीकडे आपल्या व्यवसायाची सूत्रे सुपूर्द करण्याचे ठरवले आहे. यानुसार आकाश अंबानी जिओची जबाबदारी सांभाळतील. मुलगी ईशा अंबानीकडे रिटेल व्यवसायाची तर अनंत अंबानींकडे न्यू एनर्जी बिझनेसची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. याबद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की "या तिघांकडेही कंपनी चालवण्यासाठी लागणारी सर्वच पात्रता आहे आणि अनुभव देखील आहे. तसेच या तिघांनांही सहकार्य करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या कंपनीचे एक विशेष सल्लागार मंडळ असेल ज्यात अनेक अनुभवी आणि कंपनीशी जोडून राहिलेल्या तज्ज्ञांचा समावेश असेल. हे सल्लागार मंडळ वेळोवेळी सल्ला देण्याचे काम करेल."
रिलायन्स कंपनीने फाईव्ह जी लाँच करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी केली आहे. गुगल बरोबरच मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि इंटेल या कंपन्यांसोबतही रिलायन्सने भागीदारी केली आहे ज्यातून जिओसाठी लागणारी सर्व आवश्यक तंत्रे आणि तंत्रज्ञान मिळवले जाईल. या सगळ्यांवरून असेच म्हणता येईल की देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आता फाईव्ह जी साठी सज्ज झाली आहे. तेव्हा उत्सुकता आहे ते फाईव्ह जी युग प्रत्यक्षात अवतरण्याची.