नवी दिल्ली : देशात महामार्गांची वेगवान उभारणी होत आहे. अनेकदा महामार्ग हे वनविभागातून जात असल्याने तेथे वन्यजींवांसाठी ‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’ची उभारणी केली जात आहे. त्यापैकी दिल्ली – डेहराडून महामार्गावर १२ किमी लांबीचा आशिया खंडातील सर्वांत लांब ‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’ची उभारणी करण्यात येत आहे.
देशातील जनतेचा वेळ आणि संसाधनांची बचत करण्यासाठी पायाभूत सुविधा विकासांतर्गत दर्जेदार रस्ते व महामार्गांची उभारणी केली जात आहे. महामार्गांची बांधणी करताना अनेकदा वने आणि जंगलातही महामार्गांच्या काही भागाची बांधणी केली जाते. मात्र, महामार्गांची बांधणी आणि त्यानंतर त्यावरून होणारी वाहतूक, यामुळे वन्यजींवांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी विशेष अशा ‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’ची उभारणी करण्यात येत आहे. याअंतर्गत दिल्ली – डेहराडून द्रुतगती महामार्गांवर आशिया खंडातील सर्वांत लांब ‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’ची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये ३४० मीटरच्या डाटकाली बोगद्याचाही समावेश आहे.
केंद्रीय रस्ते बांधणी मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा (एनएचएआय) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दिल्ली – डेहराडून द्रुतगती महामार्गाचा २० किमीचा भाग हा राजाजी राष्ट्रीय उद्यानातून जातो. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीमुळे वन्यजीवांची गैरसोय होई नये, यासाठी आशिया खंडातील सर्वांत लांब १२ किमीच्या उन्नत ‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’ची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे वन्यजीवांनी कोणत्याही धोक्याशिवाय वावरणे शक्य होणार आहे. गणेशपूर - डेहराडून विभागात वन्य प्राण्यांवर वाहने आदळू नयेत यासाठी अनेक प्राणी मार्ग तयार करण्यात आले आहेत. दिल्ली - डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये ५०० मीटरच्या अंतराने रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ४०० हून अधिक वॉटर रिचार्ज पॉइंट्सची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
दरम्यान, जवळपास २१० किमी लांबीचा दिल्ली - डेहराडून एक्स्प्रेस वे दिल्ली आणि डेहराडून दरम्यानचा प्रवास वेळ सहा तासांवरून सुमारे अडिच तासांपर्यंत कमी करणार आहे. यामध्ये हरिद्वार, मुझफ्फरनगर, शामली, यमुनानगर, बागपत, मेरठ आणि बरौत या शहरांना जोडण्यासाठी सात प्रमुख इंटरचेंज असणार आहेत.
विकासासह पर्यावरण संवर्धनाचा ‘गडकरी पॅटर्न’
देशाच्या आर्थिक विकासास गती देण्यासाठी देशातील पायाभूत सुविधा, प्रामुख्याने रस्ते व महामार्गाचे जाळे मजबूत हवे; हा विचार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी वारंवार मांडत असतात. मात्र, पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यावरही त्यांचा भर असतो. त्यामुळे वनविभागातून जाणाऱ्या महामार्गांवर ‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’ची निर्मिती करण्यावर त्यांचा भर आहे. त्याचप्रमाणे महामार्ग बांधकामात झाडे तोडण्याची वेळ आल्यास त्या महामार्गावर दुपटीने वृक्षारोपण करण्याचे धोरण राबविले जात आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वे प्रकल्पामध्ये नितीन गडकरी यांनी तेथे असलेल्या वृक्षांचे अन्यत्र रोपहणी यशस्वी करून दाखविले आहे. त्यामुळे विकासासह पर्यावरण संवर्धनाचा ‘गडकरी पॅटर्न’ तयार झाला आहे.
‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’ म्हणजे काय ?
‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’ दोन वेगवेगळ्या टोकांच्या दरम्यान प्राण्यांसाठी सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्यासाठी उभारण्यात येतो. ‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’प्राणी आणि वनस्पतींमधील परस्परसंबंध कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.