नवी दिल्ली : देशातील युपीआय वरून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांनी ६.२८ बिलियनचा टप्पा पार केला. नॅशनल पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबद्दल माहिती दिली आहे.देशाने गाठलेल्या या टप्प्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त देशवासीयांची अभिमानदं केले आहे. या सर्व ऑनलाईन व्यवहारांतून १० लाख ६२ हजार ७४७ कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे. २०१६ सालानंतर नोंदवली गेलेली ही सर्वात मोठी वाढ आहे.
कोरोना काळात आपल्याला या युपीआय व्यवहारांचा खूपच फायदा झाला होता. भारताने गाठलेला हा टप्पा हे भारतीयांनी दाखवलेल्या एकत्रित निष्ठेचे आणि एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक आहे असे पंप्रधानांनी आपल्या ट्विटरवरून दिलेल्या संदेशात म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था डिजिटलीकरणाकडे, पर्यावरणपूरक आर्थिक व्यवहारांकडे वाटचाल करत आहे असा विश्वासदेखील पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
२०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर या ऑनलाईन आर्थिक व्यवहारांना गती मिळाली होती. देशातील जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार हे या डिजिटल माध्यमांतून व्हावेत यासाठी केंद्र सरकारकडून उत्तेजन देण्यात येत असते. या व्यवहारांमध्ये अधिकाधिक सुलभता येऊन रोखीने होणाऱ्या व्यवहारांना सुरक्षित आणि सोपा पर्याय म्हणून या ऑनलाईन व्यवहारांकडे बघितले जाते.