नवी दिल्ली : " हे केंद्रातील सरकार स्मशानभूमी, दफनभूनी, शवागारांवरही जीएसटी लादून लोकांची लूट करतेय हा विरोधकांकडून चालवलेला अत्यंत खोटा प्रचार आहे, या सर्व गोष्टींवर कुठलाही जीएसटी लादलेला नाही" असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिले आहे. या रसर्व सेवा पूर्णपणे जीएसटीमुक्त आहेत त्यामुळे नागरिकांवर त्याचा कुठलाही बोजा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादून सरकार जनतेची लूट करत आहे असा आरोप विरोधकांनी लोकसभेत केला होता. ४७व्या जीएसटी परिषदेत ब्रँडेड दूध, पॅकबंद वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ करण्यात आली होती त्यावरून लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला होता. त्यातच स्मशानभूमींसारख्या गोष्टींवरही सरकार कर लादणार का? असा सवाल विरोधकांकडून केला जात होता त्याला निर्मला सीतारामन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
जरी या गोष्टींवर कुठलंही जीएसटी लागणार नसला तरी त्यांच्या बांधकामांसाठी लागणाऱ्या वस्तूंवर मात्र जीएसटी लागणार आहे. नव्या स्मशानभूमीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तूंवरही जीएसटी लागणार आहे कारण असे केले नाही तर त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे नुकसान होईल असेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.