यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणले हाच क्रांतिकारी बदल
18-Aug-2022
Total Views | 159
51
मुंबई : राष्ट्रवादीची धडाडती तोफ म्हणून आणि हिंदू देवी - देवतांची येथेच्छ निंदा नालस्ती करून आंबेडकरी चळवळीत नाव कमावलेल्या सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला लक्ष्य करत, त्यांनी उद्धव ठाकरेंना धोका देऊन सरकार स्थापन करून काय क्रांतिकारक बदल घडवला? असा सवाल करत आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवले. शिंदे गटाने उठाव केल्याने शिवसेनेत जी पोकळी निर्माण झाली होती, ती भरून काढण्यासाठी, आपल्याकडे आक्रस्ताळी बोलणारे कोणीतरी हवे या एकमेव गरजेपोटी ज्यांना शिवसेनेत आणले गेले हाच क्रांतिकारी बदल मात्र त्या विसरल्या.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शिंदे गटाला लक्ष्य करत गद्दार म्हणून त्यांचा उल्लेख करत जोरदार घोषणाबाजी केली. यात आदित्य ठाकरे देखील सामील होते. त्यामुळे हीच शिवसेनेचीही भूमिका आहे हे स्पष्ट होते. पण एवढे सगळे आरोप, खालच्या पातळीवरचे आरोप होऊनसुद्धा शिंदे गटाकडून कधीच ठाकरे कुटुंबाबद्दल काहीच बोलले गेले नाही, त्यांनी कधीच ठाकरे कुटुंबियांबद्दल कुठलीच आक्षेपार्ह टिपण्णी केली नाही, पण जय सुषमा अंधारेंनी जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा बाप काढला त्या मात्र उद्धव ठाकरेंना बहिणीसमान झाल्या हाच राजकीय गरजेपोटीच क्रांतिकारी बदल नव्हे काय ? सुषमा अंधारेंनी शिवसेनेत प्रदेश करताना मी भावाच्या मदतीकरता, भाऊ संकटात आहे म्हणून मी धावून आले अशी वक्तव्ये करत आपल्या शिवसेना प्रवेशाचे समर्थन केले होते.
उठता- बसता हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या, रसर्व हिंदू धर्मीय सण- उत्सव जल्लोषात साजरे करणाऱ्या शिवसेनेला मात्र याचा विसर पडला की या त्याच सुषमा अंधारे आहेत ज्यांनी हिंदू सणांची नालस्ती केली होती. हिंदू उपासना पद्धती व त्यांचे भावविश्व यावर अत्यंत छछोरपणे टिपण्या करणारे व्हिडिओही प्रसिद्ध आहेत. ज्या तुळजाभवानीचे नाव घेत आपले सगळे उद्योग उद्धवसेना करीत असे, त्या देवी आणि तिच्या उपासनेबाबत सुषमा अंधारे काय म्हणतात? त्या काही म्हणत नाहीत, तर बहुजन समाजात ज्याप्रकारे देवीदेवतांची उपासना केली जाते, लोकगीतातून देवीची आराधना केली जाते, त्याची अंधारे खिल्ली उडवतात. यावर समोर बसलेले लोक फिदीफिदी हसत असतात. या हसण्याला अंधारे अनुयायी सापडण्याची प्रक्रिया मानतात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत मिळालेला प्रतिसाद मानतात. म्हणजे तसे त्यांनी ‘शिवबंधन’ बांधताना सांगितले आहे.
शिंदे गट निघून गेल्याने शिवसेनेत खूप मोठी पोकळी तयार झाली आहे. चांगले अगदी तळागाळातून काम करत पुढे येणारे, कार्यकर्त्यांशी कायम संपर्कात असणारे नेतेच शिवसेनेतून निघून गेल्याने आता बोलणारे, शिवसेनेची खरी ताकद असणारे नेतेच शिवसेनेत नाहीत, त्यामुळे त्यांची जागा भरून काढल्यारखे दाखवण्यासाठी, शिवसेना अजून संपली नाही हा दिखावा करण्यासाठी अंधारेंची आयात करावी लागली हाच सर्वात मोठा क्रांतिकारी बदल म्हणावा लागेल, त्यामुळे शिंदे गटाने भाजपबरोबर सत्ता मिळवून काय बदल घडवला हा प्रश्न विचारणाऱ्या अंधारेंनी आधी आपल्याला आणून काय साध्य झाले, आपली उपयुक्तता काय? यावर पहिले विचार करावा.