मुंबई : हे सरकार बेईमानी लोकांचे सरकार आहे, त्यांना जनतेचा आवाज ऐकू जात नाही अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. जे गद्दार आहेत त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही, ते गद्दार आहेत अजूनही शिवसेना आम्हीच आहोत असा दावा देखील आदित्य यांनी केला. या गद्दारांविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे तिथे आम्हांला न्याय मिळेल, गद्दारांचे हे सरकार कोसळणारच असाही दावा आदित्य यांनी केला आहे. मोहित कंबोज यांच्या ट्विटवरून त्यांच्यावर निशाणा साधत, ही राज्यातील नवीन पद्धत आहे का ? असा सवालही ठाकरे यांनी केला.
वरळी सगळ्यांना आवडायला लागली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे, दहीहंडी हा आपला सण आहे त्यात कोणीच राजकारण करू नये असे आवाहनही केले आहे. दोन वर्षांनी आपल्याला आपले सगळे सण, उत्सव साजरे करायला मिळत आहेत तेव्हा त्यात उगीच राजकारण आणून, कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावू नयेत अशी अपेक्षा ठाकरे यांनी केली. या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खरे मुख्यमंत्री कोण ? हे सर्वांच्याच लक्षात आले आहे, खरे सत्ताधारी कोण आहेत? हे आता सर्वांना कळले आहे असा टोलाही आदित्य यांनी लगावला आहे.
या मंत्रिमंडळात महिलांना, निष्ठावंत लोकांना स्थान नाही त्यामुळे त्यांना खरे कोण जवळचे आहेत हे आता कळले आहे, मंत्रिमंडळात ज्यांना स्थान मिळाले आहे त्यांनाजे मिळाले आहे त्यावरून ते महाविकास आघाडीत खूप चांगले होते, अजूनही ज्यांना परत यायचे आहे त्यांनी परत यावे आणि ज्यांना सत्तेतच राहायचे आहे त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.