'लाल सिंह चड्ढा', 'रक्षाबंधन' बॉक्सऑफिसवर का आपटले?

    15-Aug-2022
Total Views |
 

flop 
 
 
 
नवी दिल्ली : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बॉलीवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले ते म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' आणि दुसरा खिलाड़ी अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन'. हे दोन्हीही चित्रपट रिलीज होण्याआधीच खूप चर्चेत आले होते. कारण या दोन्हीही चित्रपटांवर 'बॉयकोट'चे शिक्के लागले होते. काही लोक आमीर खानच्या निमित्ताने 'लाल सिंह चड्ढा'वर राग काढत आहेत तर काही अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' चित्रपटावर. ११ ऑगस्ट २०२२ रोजी हे दोन्ही चित्रपट रिलीज झाल्यानंतर ते हिट होतायत की फ्लॉप याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण पहिल्या दिवशी या चित्रपटांनी केलेली कमाई ही त्यांच्यासाठी निराशाजनक आहे.
 
 
 
 
'रक्षा बंधन' vs 'लाल सिंह चड्ढा'
 
'रक्षा बंधन'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त ८ कोटी रुपये कमावले तर दुसऱ्या दिवशी हा आकडा आणखी घसरून ६.२५ कोटींपर्यंत आला. याच्या जोडीने रिलीज झालेल्या 'लाल सिंह चड्ढा'ने ११.५० कोटी रुपये पहिल्या दिवशी कमावले परंतु दुसऱ्या दिवशी तो फक्त ८ कोटीच कमवू शकला, म्हणजे हा आकडा साधारण ४०टक्क्यांनी घसरला. 'रक्षाबंधन' आणि 'लाल सिंह चड्ढा' फ्लॉप होण्यामागे अनेक कारणे आहेत.
 
 
 
 
लोकांसमोर आदर्श उभा करणाऱ्या आणि जनजागृती करणाऱ्या अक्षय कुमारने ज्यावेळी पानमसाल्याची जाहिरात केली तेव्हापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्या जाहिरातीनंतर अक्षयचे आलेले 'बच्चन पांडे' आणि 'पृथ्वीराज'ला हे दोन्हीही चित्रपट फारसे चालले नाहीत आणि त्यानंतर 'रक्षाबंधन' देखील प्रेक्षकांनी बॉयकोट केला आहे. शिवाय बॉयकोट करण्यामागे प्रमुख कारण आहे या चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लन; कारण तिने यापूर्वी अनेकदा हिंदूविरोधी आपली मते व्यक्त करून तसेच हिंदू संस्कृती विरोधात आक्षेपार्ह विधाने करून हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या आणि लोक याला विरोध करू लागल्यानंतर लगेचच तिने या पोस्ट आपल्या अकाऊंट वरून हटवल्या.
 
 
 
 
तर आमीर खानने देखील पूर्वी भारतविरोधात काही आक्षेपार्ह विधाने केली होती. शिवाय या चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावतील असे काही प्रसंग दाखविण्यात आले आहेत, एवढेच नाही तर भारतीय सेनेचा देखील अपमान होईल अशी काही दृश्य या चित्रपटात दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे हे दोन्हीही चित्रपट रिलीज झाले असले तरीही चित्रपटगृहात कितीपत तग धरतील सांगता येत नाही.