सुनील किटकरू लिखित ‘वार्ता ईशान्य भारताची` या पुस्तकाचे प्रकाशन
10-Aug-2022
Total Views |
नागपूर : “देशापुढे आज अनेक आव्हाने आहेत. देशात मोठ्या प्रमाणात विविधता असून या सगळ्यांना जोडण्यासाठी, संघटित करण्याची मोठी जबाबदारी समाजावर आहे. समाजानेही आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार, संस्था, संघावर अवलंबून न राहता स्वावलंबी झाले पाहिजे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. ‘विदर्भ साहित्य संघा`च्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘विदर्भ साहित्य संघ-ग्रंथालया`च्यावतीने वर्षभर राबविण्यात आलेल्या ‘संस्थांची शतकोत्तर आव्हाने` या व्याख्यानमालेचा समारोप झाला.
त्यावेळी डॉ. मोहनजी भागवत यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा`च्या शतकोत्तर आव्हानांवर प्रकाश टाकला. ‘विदर्भ साहित्य संघा`च्या अमेय दालनात मंगळवारी झालेल्या व्याख्यानमालेच्या समारोपीय समारंभाला ते उपस्थित होते. यावेळी मंचावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘नरकेसरी` प्रकाशनने प्रकाशित केलेल्या सुनील किटकरू लिखित `वार्ता ईशान्य भारताची` या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. मनोहर म्हैसाळकर यांच्या हस्ते डॉ. मोहनजी भागवत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, सुनील किटकरू व ‘नरकेसरी` प्रकाशनचे धनंजय बापट यांचा डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शाश्वत
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शतकाकडे वाटचाल करीत असून विपरित परिस्थितीत सर्वांना जोडण्याचे काम सातत्याने करत आला आहे. प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन, ‘स्व`चे स्पष्ट भान, राष्ट्राबद्दलच्या कल्पना व देशाकरिता जगण्या-मरण्याची तयारी असलेले लोक संघात आहेत. संघ हा शाश्वत असून त्याची मूल्ये कधीच बदलत नाही. ध्येयनिष्ठा, आत्मीयता, अनुशासन आणि आपपरभाव नसणे, हा संघाचा स्वभाव असून ज्या उद्देशाने डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली, तो उद्देश कार्यपूर्तीपर्यंत तसाच राहील,” असा विश्वास डॉ. मोहनजी भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. किटकरू यांच्या पुस्तकावर भाष्य करताना डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, “हे पुस्तक जीवंत अनुभवातून आलेले, सहज, सोप्या भाषेतील हे पुस्तक वाचनीय आहे. ‘गुगल`मुळे आपण जरी अख्ख्या जगाची माहिती ठेवत असलो, तरी आपला देश, प्रदेशाची आपल्याला माहिती नसते. त्यामुळे बुद्धीने माहिती मिळते, पण मनाची आर्तता कोरडी व्हायला लागते. ही आर्तता, ही तळमळ जशी इतर माहिती घेण्यासाठी असते, तशी ती आपल्या देशाबद्दल असली पाहिजे,” असे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
“डॉ. मोहनजी भागवत यांच्याबरोबर एकत्र बसण्याचा हा सन्माननीय योग ‘नरकेसरी` प्रकाशनामुळे मिळाला,” असे सांगत मनोहर म्हैसाळकर यांनी धनंजय बापट यांचे आभार मानले. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अरुणाचल प्रदेशात कार्य करत असताना राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समावेश ‘वार्ता ईशान्य भारताची` पुस्तकात समावेश करण्यात आला असून दुसऱ्या भागात राष्ट्रीयत्वासाठी कार्य करणाऱ्या संघटनांचा समावेश आहे,” असे सुनील किटकरू यांनी सांगितले. विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र डोळके यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या स्थापनेचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक अलोणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले.
ग्रंथालयाचे केले कौतुक
विदर्भ साहित्य संघाच्या `ग्रंथसहवास`ला डॉ. मोहनजी भागवत यांनी भेट दिली. मंगळवारी ‘रंगनाथन दिन` असल्यामुळे डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व प्रा. डॉ. सुधीर बोधनकर यांच्यासह भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, भारताचे संविधान या ग्रंथांचे पूजन करण्यात आले. डॉ. मोहनजी भागवत यांनी ग्रंथालयाची पाहणी केली व येथील ग्रंथसंपदेचे कौतुक केले.