एके रात्री अश्वत्थामा पांडवांच्या शिबिरात गेला आणि शिबिरातील पांडवांना कंठस्नान घालू लागला. परंतु, त्याच्या दुर्दैवाने धर्म आदी पंचपांडव आणि पत्नी द्रौपदी काही कामास्तव बाहेर गेल्यामुळे ते वगळून सारे पांडवपुत्र मारले गेले. धन्यकाम होऊन पांडव मेले असे समजून अश्वत्थामा परत फिरला. परंतु, पांडवीवृत्तीचे अजून काम बाकी होते. त्यांना हस्तिनापूर राज्यावर पुन्हा अधिष्ठित व्हायचे होते. महाभारत संपायचे होते.
दुसर्या दिवशी शिबिरात परत आल्यावर पांडवांना अश्वत्थामाचे नीच कारस्थान समजले. प्रतिशोध घेण्याचा विचार करून अश्वत्थामाचा शिरच्छेद करण्याची अर्जुनाने घोर प्रतिज्ञा केली. अश्वत्थामा लपून बसला होता. त्याला शोधून काढून अर्जुनाने त्याचा शिरच्छेद करण्याचे ठरविले. परंतु, शिरच्छेद करण्याची वेळ आली असता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तसे करण्यापासून परावृत्त केले. कारण, नियमाप्रमाणे क्षत्रियाने ब्राह्मणांचा शिरच्छेद करू नये, असे धर्मशास्त्र होते. प्रभू श्रीरामांनी तर अनेक ब्राह्मण स्त्री-पुरुषांचा वध केला व कृपाचार्य, गुरुद्रोणांच्या वेळी मात्र हे धर्मशास्त्र आडवे आले नाही. मग अश्वत्थामाच्या वेळेसच तो धर्म का आठवला? त्याचे कारण ब्राह्मणात नसून ब्राह्मवृत्ती होती. ब्रह्मवृत्तीला कधीच नाहीसे करू नये हा याचा अर्थ आहे.‘अ+श्व+त्थामा’ म्हणजे साधकाची श्वासविरहीत ब्रह्मावस्था (समाधी अवस्था) असल्याने त्या अर्थाने अश्वत्थामाला मारणे अधर्म्य कर्म होते. पूर्वीच्या युद्धात मात्र कृप वा द्रोणांची मान कापली गेली, यावरून अश्वत्थामा प्रकरण लिहिणारे भगवान व्यासांशिवाय अन्य कुणीतरी नंतरचे पण श्रेष्ठ लेखक असावेत, हे स्पष्ट होते.अश्वत्थामाचा वध करेन, अशी अर्जुनाने प्रतिज्ञा केली. त्याचे काय? त्यावर भगवान श्रीकृष्णाने तोडगा काढला. एखाद्या पुरुषाच्या डोक्यावरील केशसंभार कापला की, त्याचे शरीर कापले असे समजावे, असा श्रीकृष्णाने शास्त्राधार सांगितला. व्यासकाळात केशसंभार ब्राह्मणसुद्धा ठेवत असत, असे यावरून दिसते. मध्यकालीन ब्राह्मणांमध्ये केशमुंडन करण्याची रीत कोठून आली, याचे संशोधन करण्यासारखे आहे.
आणखी एक गोष्ट यातून निघते आणि ती ही की, एखाद्याचे मुंडन करणे त्याकाळात अपमानास्पद मानलेले असे दिसते. नवीन पंथ निघाला की, त्याची इतर लोक टिंगल करीत असतात. अश्वत्थामाच्या डोक्यावरील केस कापण्यात अर्जुनाने अश्वत्थामाचा उपहास केला. अर्जुनाने अश्वत्थामाच्या डोक्यावरील केवळ केसच कापले नाही, तर त्याच्या डोक्यावरील मणी सुद्धा कापला. तो मणी कापल्यामुळे अश्वत्थामाच्या डोक्यावर जो घाव झाला तो अजून बरा झाला नसून अश्वत्थामा चिरंजीवी मानल्यामुळे तो अजून आपल्या घावाचे दुःख सोशीत सारखा फिरत असतो, अशी सर्वसाधारण कल्पना आहे. वास्तविक कोणतेच जडशरीर चिरंजीवी असू शकत नाही. मग, वाईट कर्म करणारे अश्वत्थामा, द्रोण, कृप इत्यादी दुराचारी असे चिरंजीवी कसे, असा महत्त्वाचा प्रश्न डोक्यात आल्याशिवाय राहत नाही. अश्वत्थामाच्या डोक्यावरील मणी समजण्याकरिता साधनेतील एका श्रेष्ठ अवस्थेचा अनुभव असायला हवा. एरवी कोणत्याच मानवाच्या डोक्यात मणी नसतो. मग अश्वत्थामाच्या डोक्यातील हा मणी कोणता असावा? साधना उच्च झाल्यावर साधकाला आपल्या डोक्याच्या आत वरच्या बाजूला एक चंद्र दिसत असतो, या अवस्थेचे वर्णन गीतेत आले आहे. आठव्या अध्यायातील २५, २६ श्लोकांत या चंद्रावस्थेचे वर्णन आहे. त्याला चांद्रमस असे म्हटले आहे.
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्।
तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥ २५॥
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते श्र एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥२६॥
ज्या योग्याला ध्यानावस्थेत डोक्यात असा चांद्रमास ज्योतीरूप मणी दिसतो व ज्याने मृत्यूला जिंकले आहे. अर्थात, ज्याला सूक्ष्म शरीराचे अतींद्रिय अनुभव आहेत, तो श्रेष्ठ चिरंजीवी नाही तर काय? तो पुन्हा अशाश्वत जगात जन्म घेत नाही. स्वामी विवेकानंद व भगवान श्रीरामकृष्ण परमहंस यांची भेट झाल्यावर रामकृष्णांनी विवेकानंद यांना हा प्रश्न विचारला होता की, “बाळा, तुला ध्यानावस्थेत वा डोळे बंद केल्यावर चंद्र दिसतो का?” उत्तर होकारार्थीच होते. खरे गुरू अंतर्यामी असतात. ते आपल्या शिष्यांची आध्यात्मिक अवस्था, भूत, भविष्य वर्तमान सर्व ओळखतात. त्यानुसार त्यांना साधनेत मार्गदर्शन करीत असतात. विवेकानंदांना ते एकांतात निराकाराची उपासना सांगत असत. तो त्यांचा अधिकारच होता. अश्वत्थामाच्या डोक्यातील हाच चंद्रमणी अर्जुनाने कापला होता. ही उच्च अवस्था जरी असली तरी साधक त्या अनुभवात गुंतून राहू शकतो. त्यामुळे अर्जुनवृत्तीला वृत्तीच्या युद्धात विजय मिळून ती हस्तिनापूरच्या अध्यात्मिक राज्य सिंहासनावर बसू शकली. पांडववृत्तींना अजून राज्य करायचे असल्याने अर्जुनाने निवृत्तीरूप अश्वत्थामाच्या डोक्यातील चंद्रदर्शनरूप मणीच कापला. अर्जुनरूप क्षत्रिय वृत्तीला अश्वत्थामारूप ब्रह्मवृत्ती नको होती, हा या अर्जुनकृत्याचा अर्थ आहे. ब्रह्मरूप अवस्था या विश्वात चिरंतन राहणार. या अर्थाने अश्वत्थामा चिरंजीव दाखविला आहे. यावरून अश्वत्थामा नावाची कोणी देहधारी व्यक्ती पाहणे वा तसल्या गोष्टी करणे योग्य नव्हे. अश्वत्थामा उच्च साधकावस्था आहे. अश्वत्थामा मणी तो हाच आहे. असा दिव्य अनुभव ज्या ज्या उच्च साधकाला येत असेल तो अश्वत्थामाच होय असे त्याने समजावे. योगमार्गातील हे गहन अनुभव आहेत.अशा तर्हेने भगवान वेदव्यासांनी आपल्या अचाट बुद्धिसामर्थ्याने योगमार्गातील गहन दिव्य भव्य अनुभव आपल्या अजोड कथा पद्धतीने जगासमोर मांडले आहेत. त्यातील ज्ञान प्राप्त करणे, प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. मग त्या मानवाचा धर्म, देश, आर्थिक जीवन कोणतेही असो. रामायण, महाभारत, भागवतातील उच्च व गुह्य ज्ञान जगासमोर मांडण्याचे काम भारताचे आहे, पण तसे करण्याकरिता स्वतःला त्या दिव्य गहन योगसाधनांचा प्रत्यक्ष अनुभव यायला हवा. या दृष्टीने आपल्या दिव्य ग्रंथाचे वास्तविक अध्ययन व परिशीलन होणे आवश्यक आहे.
सापेक्षतावाद व पुराणकथा
ज्या प्रमाणात विज्ञानाची प्रगती होऊन नवनवे शोध लागत आहेत. त्या प्रमाणात अशास्त्रीय धर्मपंथांच्या कल्पनांना धक्का बसून ते पंथ वैज्ञानिक युगात डळमळीत होताना दिसून येत आहेत, तर वैदिक परंपरा मात्र आपल्या वैज्ञानिक व शास्त्रीय धारणेमुळे अधिक उजळून येत आहे. याचे कारण अन्य धर्मपंथाप्रमाणे वैदिक परंपरा केवळ अंधविश्वासावर आधारित नसून ज्ञानविज्ञानावर आधारित आहे. वैदिक परंपरांचे शास्त्रीय दर्शन विज्ञानयुगात अधिकाधिक होत आहे आणि त्यामुळे सर्व जगाचे लक्ष वैदिक परंपरा धारण करणार्या भारताकडे अधिक आकर्षिले जात आहे. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादापासून विज्ञानाचे लक्ष ज्ञानाकडे अधिकाधिक खेचले जाऊ लागले आहे.
(क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)