पंढरपूर : आषाढी एकादशी येताच हजारो वारकऱ्यांची पाऊले आपसूकच पंढरपूरच्या दिशेने वळतात. आषाढी एकादशी आता अवघ्या २ दिवसांवर आली आहे. आणि लाखोंच्या संख्येने विठ्ठल भक्त पंढरपुरात आले . या भक्तांमध्ये अनेक कलाकारांचा देखील सहभाग आहे. मागील काही दिवसांत ते देखील पंढरीच्या दर्शनासाठी वारीत सहभागी झाले आहेत. यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी याने देखील पायी येत वारीचा अनुभव घेतला आहे. वाखरी ते पंढरपूर असा पायी वारीचा प्रवास केल्यानंतर त्याने आपल्याला आलेला अनुभव शेअर केला आहे.
स्वप्निल जोशीचे पंढरीची वारी पायी करण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. स्वप्निल जोशीला पांडुरंग कसा भेटला याचा अनुभव त्यानं सगळ्यांबरोबर शेअर केला. तो म्हणतो, 'काल वाखरी ते पंढरपूर पायी वारी चाललो. अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली. कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे. बघू, पांडुरंग कधी संधी देतो' असे म्हणत संपूर्ण वारी पायी करण्याची संधी दे असे साकडे स्वप्निलने पांडुरंगाकडे घातले आहे. त्याचबरोबर तो म्हणतो, 'वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही. आम्ही सिनेमातले हिरो आहोत फक्त! पण खरे हिरो हे वारकरी! वर्षनुवर्ष तहान भूक विसरून, पाई वारी चालतात. पायाला सूज येते, पण मनाची, विचारांची सूज कायमची निघून जाते, त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं'.
भावूक होत पोस्टच्या शेवटी स्वप्निल म्हणाला, 'लिहायचं खूप आहे, शब्द सुचत नाहीत. हा "प्रवास" प्रत्येकाने एकदा तरी करावाच. माझी आजी म्हणायची..."तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत !" काल मला कळलं ती काय म्हणायची.'
एवढेच नाही तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने, स्वप्निल जोशीने आपल्या टीमसह वारीतील सर्व वारकऱ्यांना अन्नदान केले. त्यांच्या श्रमपरिहाराची, पाण्याची सोय केली. मनोरंजनाबरोबर समाज सेवा करता येत आहे याचा आनंद वाटत' असल्याचे देखील स्वप्निलने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.