डोंबिवली: “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वागणुकीतून पक्षासाठी त्याग व समर्पण भावनेचा आदर्श घालून दिला आहे. त्याच आदर्शावर आपण एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणे आवश्यक आहे. तसेच, हिंदुत्व आणि विकास हे समांतर धोरण आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे,” असे मत आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
शिवसेना-भाजपप्रणित सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यात तसेच सुरत ते गुवाहाटी असे ‘ऑपरेशन कमळ’ राबविताना ‘मिशन कंट्रोलर’ ही कामगिरी बजाविल्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण गुरुवारी डोंबिवलीत आले. भाजप कल्याण जिल्ह्याच्यावतीने त्यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी आ. रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाब करंजुले, भाजयुमोचे कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, माजी नगरसेवक विकास म्हात्रे, राहुल दामले, रेखा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, “संयम हीच भाजप कार्यकर्त्याची खरी ताकद असून, त्याने जबाबदारीचे भान ठेवावे. नरेंद्र मोदी यांना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे. त्यामुळे समर्पण भावनेने पक्षाची आणि जनतेची कामे करत राहा. पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर ती तन-मन-धनाने पूर्ण करणे हेच एक कार्यकर्ता म्हणून ध्येय ठेवले. सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतील एक छोटी जबाबदारी मला देण्यात आली आणि त्या जबाबदारीने मला मोठे केले, असे फार तर मी म्हणेन.”
यावेळी कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले की, “दूरदृष्टी, व्हिजन ज्यांच्याकडे असते तोच यशस्वी होतो. आ. रवींद्र चव्हाण यांच्याकडे ती दूरदृष्टी आहे. प्रत्येकाच्या मनात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले पाहिजे हीच इच्छा होती आणि अशा हिंदुत्ववादी सरकारच्या स्थापनेत आ. रवींद्र चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. पक्षनिष्ठा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिकली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पक्षाच्या आदेशाचे विनातक्रार पालन केले. आ. रवींद्र चव्हाण हे दिवसातील २४ तास जनतेसाठी उपलब्ध असणारे नेते आहेत. सत्तास्थापनेच्या प्रमुख घडामोडीत आमचा नेता असल्याचा प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद आहे.” तसेच, चव्हाण यांच्या पुढील वाटचालीतही प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासोबत राहील,” अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.