"बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे उद्धव ठाकरेच!"

वाढदिवसाच्या दिवशीच रामदास कदमांचा मोठा गौप्सस्फोट

    27-Jul-2022
Total Views |

Ramdas Kadam
 
 
 
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष जोरात सुरु असताना शिंदेगटात सामील झालेले रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. रामदास कदम यांनी बुधवारी (दि. २७ जुलै) आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. "बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनीच केले.", असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
 
 
रामदास कदम यावेळी म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर मी त्यांना निश्चितपणे शिवसेनाप्रमुख म्हटलं असतं. पण मी त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन. आज ते शरद पवारांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करतायत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम, त्यांच्या विचारांशी गद्दारी ही दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडूनच झाली."
 
 
"भावनिक आव्हान आणि ब्लॅकमेल करायचं एवढंच काम सध्या सुरु आहे. तीन वर्षांत आमदारांना ते भेटले असते तर आज ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरेंना स्वतःचं खातं सोडून इतरांची खाती सांभाळायची आहेत. आमदार, खासदारांना भेटायचं सोडून जनसंवाद यात्रा काढत ते सर्वांना भेटत सुटलेत. हेच जर तीन वर्षांत केलं असतं तर शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती.", असेही ते पुढे म्हणाले.
 
 
आदित्य ठाकरेंचं शिवसेनेत योगदान काय?
"आदित्य ठाकरेंचं मुळात शिवसेनेत योगदान काय? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. प्लास्टिक बंदीचा निर्णय मी घेतला तरी सभागृहात आदित्यंनी खोटं बोलून प्लास्टिक बंदी त्यांनी केली असं सांगितलं. दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घेणं हे जास्त दिवस चालत नाही.", असे कदम यावेळी म्हणाले.
 
 
ठाकरेंची मुलाखत म्हणजे 'उंदराला मांजर साक्ष!'
"उद्धव ठाकरेंची मुलाखत मी पाहिली. उंदराला मांजर साक्ष अशीच काहीशी ती झाली. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि उद्धव ठाकरे उत्तर देणार. हे सर्व हास्यास्पद आहे. यात नवीन काय? संजय राऊत नेमके कोणाचे नेते आहेत? त्यांना शिवसेना एकत्र ठेवायची आहे की नाही?", असे म्हणत कदमांनी राऊतांच्या मुलाखतीवर चांगलीच प्रतिक्रिया दिली.