नवी दिल्ली : सीबीआयने १०० कोटी रुपयांच्या बदल्यात राज्यसभा सदस्यत्व आणि राज्यपालपद देण्याचे आमिष दाखविणाऱ्या आंतरराज्य टोळीस अटक केली आहे.राज्यसभेचे सदस्यत्व आणि राज्यपालपद आणि केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांचे अध्यक्षपद मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन १०० कोटी रुपयांची फसवणूक करणार्या आंतरराज्य टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सीबीआयने अलीकडेच अनेक ठिकाणी छापे टाकून टोळीतील चार जणांना अटक केली आहे.
सीबीआयअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिमेदरम्यान एक आरोपी सीबीआय अधिकाऱ्यांवर हल्ला करून पळून जाण्यात यशस्वी झाला. सीबीआय अधिकार्यांवर हल्ला केल्याप्रकरणी फरार आरोपीविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात वेगळा एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
गेल्या अनेक आठवड्यांपासून सीबीआयची या टोळीवर पाळत होती. फोन टॅपिंगच्या मदतीने सीबीआयने या आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना अटक केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील लातुरचा करमळकर प्रेनकुमार बंडगर, बेळगावचा रवींद्र विठ्ठल नाईक, दिल्ली – राष्ट्रीय राजधानी परिसरातील महेंद्रपाल अरोरा आणि अभिषेक बुरा यांचा समावेश आहे. हे आरोपी आपली उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते – पदाधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे भासवत असत, असेही सीबीआयतर्फे सांगण्यात आले आहे.