"एकनाथ शिंदे तुमच्याकडे आले होते तेव्हा त्यांचं का ऐकलं नाही?"
दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
25-Jul-2022
Total Views | 209
73
मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाम भूमिका घेत शिवसेनेतून शिंदेगट वेगळा झाल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा कुटुंबियांवर थेट आरोप न करण्याची भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी वारंवार घेतली होती. मात्र, शिंदे गटावर ठाकरे गटातून सातत्याने टीका होत असल्याने सोमवारी (दि. २५ जुलै) पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.
"आम्ही नाराज दिसतो का? आमच्यात कोणी नाराज आमदार दिसतोय का तुम्हाला? कारण आम्ही तत्वावर चालणारे आहोत. भाजपसोबत युतीही बाळासाहेबांनी केली होती. जेव्हा आम्ही एकमेकांविरोधात लढलो तेव्हाही ही युती कायम राहिली. आजची युतीही उद्धव साहेबांनी केलेली आहे. आजची दिलेली मत ही एकट्या शिवसेनेची नाहीत. ती शिवसेना भाजप युतीला मिळालेली मतं आहेत. आम्हाला तेव्हा साहेब म्हणाले असते एकटं लढायचं तर आम्ही लढलो असतो. त्यामुळे रस्त्यावर उतरून जे आम्ही लढलो असे सांगत आहेत त्यांनी एकट्याने लढून मत मिळवून दाखवावी.", असं थेट आव्हान यावेळी केसरकर यांनी ठाकरेंना केले. तसेच, आमच्या बाजूने जे आलेत त्यांना तुम्ही काढताय. लोकशाही आहे की नाही. बाळासाहेब एका कुटुंबाचे नाहीत तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत, असेही केसरकरांनी सांगितले.
यावेळी बोलताना केसरकर म्हणाले," महाराष्ट्राच्या जनतेने आणि विशेषत: शिवसैनिकांनी लक्षात घेतले पाहिजे. आज ज्या काही भावना भडकवल्या जात आहेत, त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. कारण आज जी व्यक्ती मुख्यमंत्री आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंनीच मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो म्हणून वचन दिलं होतं. बाळासाहेब दिलेलं आश्वासन पूर्ण करायचे. तुम्ही आश्वासन पूर्ण केलं नाहीत. उलट एकनाथ शिंदेच तुमच्याकडे आले. त्यांनी तुम्हाला सांगितलं की, तुम्हीच मुख्यमंत्री राहा, मात्र आम्हाला हिंदुत्वासोबत जायचं आहे. त्यावेळी तुम्ही त्यांचं का ऐकला नाहीत. तसेच हिंदुत्वासोबत का गेला नाहीत?", असा सवाल दीपक केसरकर यांनी विचारला.
हे राजकारण थांबवा
"मी तीन प्रश्न विचारले होते. त्यापैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला नाही. केंद्राशी चांगले संबंध राहिले असते तर विकासाला चालना मिळाली असती. पण रोज सकाळी ९ वाजता उठायचे आणि केंद्रावर टीका करायची हेच धोरण राबवलं गेलं. त्यामुळे केंद्राशी संबंध चांगले राहिले नाही, अशी टीका करतानाच गेली अडीच वर्षे राजकारण सुरू होतं. दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबलं पाहिजे.", असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले.
सातव्या मजल्यावरील ऑफिसमध्ये कितीवेळा गेलात?
"आता प्रवक्त्यांची भाषा पुन्हा घसरू लागली आहे. प्रवक्ते पुन्हा एकदा सुरू झाले त्यांच्या प्रवक्त्यांची भाषा मधल्या काळात सौम्य झाली होती. आता ते पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. लोकांना खोटं सांगून रडवत आहेत. कशासाठी हे? आता जे युवासेना प्रमुख आहेत. ते शाखा शाखांमध्ये फिरताहेत. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण हे लोक आधी कुठे होते? लोकांना रडवायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे. पक्षप्रमुख आजारी असताना कटकारस्थान झालेलंच नव्हतं, हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलं पाहिजे. तुम्हाला भेटून वारंवार आघाडी तोडण्याबाबत सांगितलं होतं, त्यात काही कटकारस्थान होतं का? शिवसेना वाचवण्यासाठी तर ही आघाडी बनता कामा नये. तसेच शिवसेनेचं मुंबई हे हृदय आहे. त्यावेळी तुम्ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहिली पाहिजे, यासाठी तुम्ही मोदींशी बोलणी का केली नाही. तुमची बोलणी जर महाराष्ट्राच्या सत्तेसाठी असतील तर मग मुंबईचा विचार कुणी करायचा. मुंबईचं अस्तित्व, मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व शिवसेनेने टिकवलंय, म्हणून आम्ही शिवसेनेत आलो. आज तुम्ही मुंबईत दिसायला लागलात. शाखांशाखांमध्ये फिरायला लागलात.", असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला.
कोणाच्या घरावर चाल करून जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
"कालपर्यंत तुम्ही सांगत होता की लोकांच्या बांधापर्यंत चला. मात्र आता आपल्या कार्यकर्त्यांना बांधापर्यंत जायला सांगून त्यांना पंचनाम्यामध्ये मदत करायला का सांगत नाही. त्याच्याऐवजी राज्यात राजकारण सुरू आहे. प्रत्येकाला हिणवण्याचं काम सुरू आहे. आमच्या एका खासदारांच्या घरावर मोर्चा काढला. तुम्हाला एखाद्याच्या घरावर जाण्याचा अधिकार कुणी दिला. तुम्हाला वाटलं तर सभा घ्या, जनतेशी बोला. कुणाच्या घरावर चाल करून जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,", असेही केसरकर म्हणाले.
निवडणुका युती म्हणूनच लढवणार
"ज्यावेळी निवडणूका येतात तेव्हा निवडणूक आयोग याचा विचार करते. दोन्हीकडील लोकांना चिन्ह सुचवले जातात. यापूर्वीही अशी प्रक्रिया घडलेली आहे. त्यातील एक चिन्ह निवडावे लागते. एबी फॉर्म भरता येतो. यापूर्वी बिहारमध्ये अशी फूट पडली होती. त्यामुळे याची प्रक्रिया ठरलेली आहे. जे काही चिन्ह आम्हाला मिळेल ते घेऊन आम्ही निवडणूक युती म्हणूनच लढवणार.", असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.