मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेना संकटाच्या गर्तेत सापडली आहे. शिवसेनेचे अस्तित्व टिकावे यासाठी शिवसेनेचे युवराज महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. तर इकडे शिवसेना खासदार संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर जोरदार प्रहार करत आहेत. "राजकीय तिरडी उठणारच! राज्यात सत्याचा खून केला जातोय. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा पुरावा देईल आणि जनता त्यांची गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही." असा इशारा राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे.
खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने ८ ऑगस्ट पर्यंत दिलेल्या मुदतीनंतर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. "बंडखोरी आमदारांना दिल्लीतून मान्यता मिळते आहे. दिल्लीश्वरांचे हत्यार म्हणून हे वापरले जात आहेत." असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटासह भाजप वर टीका केली. राज्यातील जनता राजकारणातून उठवणारच आहे. बंडखोर आम्ही उठाव केला असं म्हणत आहेत, पण कसला उठाव? उठाव मधील 'उठा' म्हणजे उद्धव ठाकरे आहे. ते तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाहीत." असेही राऊतांनी सांगितले.
"जो तुफानो में पलते जा रहे हैं, वहीं दुनिया बदलते जा रहे हैं!"
उर्दू शायर जिगर मुरादाबादी यांची शायरी ट्विट करत राऊतांनी आदित्य ठाकरे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल, कन्हैया कुमार, ममता बॅनर्जी यांना नमूद केल्याने आता राऊतांचा नेमका निशाणा कोणावर असा प्रश्न उपस्थित होत आहे.