आपण नवनवीन उत्पादनांच्या स्वागतासाठी कायमच उत्सुक असतो. कारण, आपल्याला सतत काहीतरी नावीन्यपूर्ण बघण्याची, जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. परंतु, आपण कधी खोलात जाऊन त्या उत्पादनांची निर्मिती प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? बहुधा नाहीच. या उत्पादन प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे, त्या उत्पादनाचे स्वरुप. ते स्वरुप नेमके कसे असणार आहे? त्या उत्पादनाची विक्री वाढण्यासाठी त्या उत्पादनाच्या ‘लूक’चा किती महत्त्वाचा वाटा असतो, याविषयी आपण अनभिज्ञच असतो. यालाच या निर्मिती प्रक्रियेत म्हणतात ‘इंडस्ट्रियल डिझायनिंग’ आणि हेच काम आपल्या ‘डिझाईन नॉनस्टॉप’ या स्टार्टअपद्वारे करणारे ऋषिकेश खेडकर आणि स्नेहल जोशी यांच्याविषयी जाणून घेऊया...
प्रत्येक उत्पादन हे आपापल्या गुणवैशिष्ट्यांमुळे वेगळे ठरते. खरंतर इतर उत्पादनापेक्षा त्या उत्पादनाची ओळखच मुळी वेगळी असावी लागते, तरच त्या उत्पादनाला बाजारात किंमत आणि मागणी असते. तसेच जे आहे, त्यापेक्षा काहीतरी नवीन या उत्पादनातून मिळावे, अशी ग्राहकांची अपेक्षा असते. उत्पादनांमध्ये हेच नावीन्य आणण्याचे काम ’डिझाईन नॉनस्टॉप’ हे स्टार्टअप सातत्याने करते. उत्पादनामागचा विचार आणि बाजारातली त्याची मागणी यांची योग्य सांगड घालणे हाच ‘डिझाईन नॉनस्टॉप’चा ‘युएसपी’ म्हणता येईल.
ऋषिकेश आणि स्नेहल दोघेही ‘आर्किटेक्चर’चे विद्यार्थी. ‘बॅचमेट’ असल्याने कायम संपर्क, विचारांची देवाणघेवाण होतच असे. पदवी शिक्षण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी ऋषिकेश अमेरिकेला आणि स्नेहल अहमदाबादला गेला. पण, दोघांचाही कायमच नोकरीपेक्षा स्वतःचे काहीतरी सुरू करण्याकडे अधिक कल होता. परंतु, व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव पाहिजे म्हणून दोघांनीही नोकरीचा मार्ग चोखाळला. पण, त्यानंतरही स्वतःचे काहीतरी सुरू करावे, हा विचार स्वस्थ बसू देत नसल्याने दोघांचा शोध चालूच होता. असेच एक काम स्नेहल यांच्याकडे आले. त्या कामासाठी मदत म्हणून स्नेहलने ऋषिकेशलाच विचारणा केली आणि हाच त्यांच्या एकत्र कामाचा आरंभ ठरला. ज्या कामासाठी ते एकत्र आले होते, ते काम तर झालेच नाही, पण इथून एकप्रकारची सुरुवात मात्र नक्कीच झाली. २०१२ साली या दोघांनी एकत्र येऊन काम करायचे ठरवले आणि कंपनीची स्थापना केली आणि नाव ठेवले ’डिझाईन नॉनस्टॉप.’
फक्त परंपरागत ‘आर्किटेक्चर’चा व्यवसाय करण्यापेक्षा काहीतरी वेगळे, आव्हानात्मक करावे, हाच त्या दोघांचा सामायिक विचार असल्याने त्यांनी पुढचे शिक्षण म्हणून ‘प्रॉडक्ट डिझाईन’ हाच विषय निवडला आणि हाच त्यांच्या व्यवसायाचाही गाभा ठरला. नाशिकसारख्या उगवत्या महानगरात अशा प्रकारचा थोडा वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करणे थोडे जोखमीचे होतेच. कारण, अशा शहरांमध्ये काम मिळेल की नाही, लोकांनी आपली संकल्पना समजेल की नाही, अशा प्रकारचे प्रश्न होते. पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये या गोष्टींबद्दल बर्यापैकी माहिती आहे. पण, राज्यात इतरत्र अशा प्रकारची कामे करण्यास लोक काहीसे साशंकच असतात. परंतु, तरी सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. नवीन येणार्या उद्योजकांना या गोष्टींची माहिती असल्याने या नवीन उद्योजकांकडून चांगली कामे मिळत होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोरोना काळात तर या व्यवसायवाढीसाठी खूप फायदा झाला. कारण, ऑनलाईन पद्धतीने सगळीकडे कामे करणे सुलभ झाले. तसेच नाशिकचा ‘डिझायनर’ मुंबईतल्या उद्योजकांसाठीसुद्धा काम करू शकतो, हे याच काळात शक्य झाले. त्यामुळे आता काम करणे जास्त सोपे झाल्याचे दोघे सांगतात. ऋषिकेश आणि स्नेहल या ‘प्रॉडक्ट डिझाईन’सोबतच इतरही ‘ग्राफिक डिझाईन’,‘आर्किटेक्चर’ची कामेही करतात. त्यामुळे आपले काम करताना विविध क्षेत्रे त्यांना हाताळता येतात आणि कामांमध्ये वैविध्यही राखता येते.
पण, नेमके ‘डिझाईन नॉनस्टॉप’ काम करते तरी कसे? तर जेव्हा कुठलाही उद्योजक आपल्या उत्पादनामध्ये नावीन्य हवे म्हणून किंवा नवीन उत्पादन बाजारात उतरविण्यापूर्वी ‘डिझाईन नॉनस्टॉप’कडे येतो, तेव्हा त्या उद्योजकाबरोबर सर्वप्रथम सर्वांगाने चर्चा केली जाते. सर्वात पहिला आणि मूलभूत प्रश्न त्या उद्योजकाला विचारला जातो. तो म्हणजे की, हेच उत्पादन का? मग, त्या उत्पादनात काय नावीन्य आणता येईल? किंवा हे उत्पादन नाही तर अजून दुसरे कुठले उत्पादन आणता येईल का? त्याची बाजारात खरंच गरज आहे का? अशा सर्व गोष्टींचा अभ्यास आणि चर्चा केली जाते. मगच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. कुठलीही परंपरागत गोष्ट करण्यापेक्षा सातत्याने काहीतरी नावीन्यपूर्ण काम करण्याकडे ‘डिझाईन नॉनस्टॉप’चा कल असल्याने याच पद्धतीने काम केले जाते. उदारहणादाखल, पेन या उत्पादनाचा विचार करायचा झाल्यास त्यात काय नावीन्य आणता येईल? तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेन हेच उत्पादन का? या प्रश्नानंतर बाजारात सध्या कुठल्या प्रकारची पेन्स उपलब्ध आहेत? त्यामध्ये कोणत्या नावीन्यपूर्ण गोष्टी आहेत? या सर्व बाबींचा विचार करून मगच त्यावर पुढील विचार आणि कृती निश्चित केली जाते. यावर ऋषिकेश एक सुंदर उदाहरण देतात की, “बाजारात एकाच प्रकारची ५० पेन्स असतील, तर मी ५१वे पेन आणून खरंच फायदा नाही. मला काहीतरी वेगळेच उत्पादन आणावे लागेल, जेणेकरून माझ्या नवीन उत्पादनाला बाजारात ग्राहक मिळतील.” अशा प्रकारे २०१२ मध्ये सुरू झालेला ‘डिझाईन नॉनस्टॉप’चा प्रवास आता महाराष्ट्रातल्या सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये हातपाय पसरु लागला आहे. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांबाहेरही ‘डिझाईन नॉनस्टॉप’ उद्योजकांपर्यंत पोहोचले आहे. भविष्यात अर्थातच संपूर्ण भारतभर व्यवसायवृद्धीचे लक्ष्य असल्याचे दोघे उत्साहाने सांगतात
या सर्व गोष्टींबरोबरच ऋषिकेश आणि स्नेहल ‘डिझाईन नॉनस्टॉप’च्या माध्यमातून अजून एक अभिनव उपक्रम राबवतात. भारतात अजूनही या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे हे क्षेत्र फारच कमी शहरांपुरते मर्यादित असल्याचे दिसते. याचा प्रसार होणे गरजेचे आहे. त्यासाठी हे दोघे आपला स्टुडिओ वर्षभरातून एकदा सर्वांसाठी खुला ठेवतात. जेणेकरून लोकांना आमच्या क्षेत्राबद्दल कळावे, त्यांनी हे क्षेत्र, त्यातील बारकावे नीट समजून घ्यावे आणि अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण क्षेत्राची माहिती करून घ्यावी, हाच उद्देश. तसेच या विषयावर ते लेखमालिकासुद्धा लिहितात आणि मुद्दाम ती मराठी भाषेतच लिहितात. कारण, इतर भाषांमध्ये आणि विशेषकरून इंग्रजीत याबद्दल पुष्कळ लिखाण झाले आहे, पण मराठीतच याबद्दल किंवा अशा विषयांबद्दल कोणी लेखन केलेले नाही. अशाप्रकारे फक्त व्यवसाय एके व्यवसाय न करता ही कला म्हणून लोकांपुढे आली पाहिजे आणि लोकांमध्ये तिचा प्रसार झाला पाहिजे, या यासाठीही हे दोघे कायम प्रयत्नशील असतात.अशा प्रकारे एका अनवट, पण खूपच महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत या व्यावसायिक जोडीचा प्रवास खूपच स्पृहणीय आहे.
व्यवसायावाढीसाठी टीमवर्क कायमच महत्त्वाचे. कारण, टीमवर्कशिवाय व्यवसायातल्या अनेक गोष्टी यशस्वी होऊच शकत नाहीत. जरी दोन भिन्न विचारांच्या व्यक्ती एकत्रित काम करत असल्या, तरी शेवटी त्यांचे ध्येय मात्र एकच असले पाहिजे आणि हीच वृत्ती कुठल्याही कंपनीच्या, व्यवसायाच्या वाढीसाठी कळीची ठरती. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यशाच्या व्याख्या बदलणे गरजेचे आहे. आजपर्यंत ज्या व्याख्या चालत आल्या आहेत किंवा समाजाने स्वीकारल्या आहेत, त्यांच्याप्रमाणेच चालणे हे गरजेचे नाही. त्यामुळे आपल्या यशाच्या व्याख्या स्वतः ठरवा आणि त्याप्रमाणे चालण्याचे धैर्य दाखवा!