मुंबई : पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली मुंबईत होणार्या अनेक प्रकल्पांना महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून जोरकसपणे विरोध केला जातो, हे उघड आहे. एका बाजूला पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणप्रेमाचे गोडवे गाणार्या शिवसेनेच्या पर्यावरणप्रेमावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विविध भागांमध्ये साचणारे पाणी काढण्यासाठी यावर्षी जवळपास ४८० पंप बसविण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये लावण्यात आलेले हे पंप चालविण्यासाठी इंधनाचा वापर केला जात असून त्यामुळे प्रदूषण होते. साधारणपणे मुंबईतील पावसाच्या स्थितीचा अंदाज घेत त्या भागातील पाणी काढण्यासाठी हे पंप तासन्तास कार्यान्वित केले जातात. त्यामुळे होणार्याप प्रदूषणाचा ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांवर विपरित परिणाम होत असून त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी खासगीत बोलताना व्यक्त केली आहे.
माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आग्रहावरून मुंबईत अनेक ठिकाणी पर्यावरण प्रेमाच्या नावाखाली विविध प्रकल्प राबविण्यात आले होते. मात्र, त्याचवेळी मेट्रो कारशेडच्या नावाखाली शिवसेनेकडून उभे करण्यात आलेले आंदोलनामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या पर्यावरण विषयक भूमिकेवर आणि पर्यावरण प्रेमावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.