मुंबई : दरवर्षी मुंबई महापालिका मुंबईतील खड्डे बुजवण्याचा दावा करते, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही करते पण इतके पैसे खर्च करूनही मुंबईत खड्डे पडतातच. या खड्यांमधून जीव मुठीत घेऊन वाट काढत राहणे हे आता मुंबईकरांच्या अंगवळणीच पडले आहे. याच खड्यांविरोधात आणि पालिकेकचा भष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी मुंबई भाजपने मुलुंडमध्ये पॉटहोल यात्रा काढली होती. मुलुंमधील भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या नेतृत्वाखाली, भाजप पदाधिकाऱ्यांनी मुलुंडच्या नाहूर जंक्शन परिसरात हे अनोखे आंदोलन केले होते.
मुंबई महापालिकेने केलेल्या दाव्यानुसार या महिन्यात आठ हजार खड्डे बुजवण्यात आले होते. तरीही मुंबईतील शहर असू दे किंवा उपनगर दोन्ही भागांत खड्डे पडलेच कसे? पालिकेला आता हे खड्डे पडलेले दिसत नाहीत का ? असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार नारेबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कारभारच निषेध केला. पालिकेकडून मुंबईकरांच्या पैश्यांचा अपव्यय होतोय आणि हा पैसा नेमका जातोय कुठे याचा शोध घेणे गरजेचे आहे आणि मुंबईला या भ्रष्टाचाराच्या विळख्यातुन सोडवले पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रकाश गंगाधर यांनी दिली.