तिलारी खोऱ्यात हत्तींचा मुक्काम वाढला

तब्बल ३०० केळी झाडांचे नुकसान

    01-Jul-2022
Total Views | 110
केळी
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील मोर्ले गावात हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागेतली केळी फस्त केली आहेत. गेले तीन दिवस मोर्ले गावात हत्तीचा मुक्काम असून गावातील केळी, काजू बागांचे मोठे नुकसान केले आहे. विजेचे कुंपण तोडून हत्तींनी केळीच्या आणि काजू बागेत नुकसान केले आहे.
 
गावातील काही भागात नारळ, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तिलारी खोऱ्यात गेले तीन-चार महिने हत्तींचा वावर आहे. हत्तीग्रस्त भागातील लोकांनी जगायचे कसे? हत्तीच्या भीतीने ग्रामस्थ घराबाहेर पडत नाहीत. घरात राहून संसाराचा गाडा कसा हाकायचा असे अनेक प्रश्न स्थानिकांना पडले असून वनविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. गेल्या महिन्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव बोर्डाची बैठक पार पडली होती. या बैठकीत दोडामार्ग मधील हत्ती प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तसेच या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत वाढ व्हावी यासाठी प्रस्ताव ही मागवले होते. परंतु त्याचे पुढे काही झाले नाही.
 
काही दिवसांपूर्वीच तिलारीच्या खोऱ्यात पाच हत्तींच्या कळपाचा मुक्त संचार करत असतानाचा व्हिडीओ ग्रामस्थांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता. या हत्तींच्या वावरामुळे ग्रामस्थ, शेतकरी भयभीत झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी एक नर टस्कर, मादी आणि त्यांची तीन पिल्ले असा एकूण पाच हत्तींचा कळप केर, मोर्ले गावात दाखल झाला. शेती, फळ बागायती, सुपारी, माड जमीनदोस्त करत या हत्तींनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यांना आवश्यक असणारा मुबलक अन्नसाठा तेथे उपलब्ध असल्याने हे हत्ती येथे तळ ठोकून आहेत. हे हत्ती कधी केर तर कधी मोर्ले गावात मुक्त संचार करतात. तर नर हत्तीमध्ये एकटा फिरतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे शेतकरी शेती करायची की नाही या विवंचनेत आहेत. शासनाने या बाबत त्वरित पावले उचलणे गरजेचे बनले आहे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121