११० तासांत ८० किलोमीटरचा रस्ता! : असा बनला 'राजपथ'चा विश्वविक्रम!

अमरावती-अकोला महामार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण

    09-Jun-2022
Total Views |
 
world record in maharashtra 1
 
 
 
 
अमरावती/अकोला : मंगळवारी अमरावती - अकोला महामार्गावर, ‘राजपथ इन्फ्राकॉन’ने सलग ८० तास ‘बिटूमिनस पेविंग’ करून, जगातील सर्व विक्रम मोडून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने याची नोंद घेतली. कंपनीने सदर विश्वविक्रम ‘आझादी का अमृत महोत्सव’निमित्त आपल्या देशाला समर्पित केला. “देशाला गौरवान्वित करणार्‍या, गेल्या सहा महिन्यांपासून सूक्ष्म नियोजन करून, जय्यत तयारी करीत होती. शिवछत्रपतींच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन, शिवसूत्रानुसार हे सर्व काम सुरू होते.
 
 
 
त्यासाठी जावळी ही ‘वॉररूम’ या कामाच्या प्रगती, साधनसामुग्री, गुणवत्ता आणि मानवी सुरक्षितता इत्यादी बाबींवर लक्ष ठेवून होती,” असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी सांगितले. विदर्भातील ४५-४६ अंश तापमान, अंगातून निघणार्‍या घामाच्या धारा, आधीच्या कंपनीच्या गोंधळाचा पसाराही त्यांना ध्येयापासून विचलित करू शकले नाही. या देदीप्यमान कामगिरीमुळे, कंपनीचे ‘साईट ऑफिस’, माना कॅम्प आणि अमरावती, अकोला जिल्ह्यात सर्वत्र उदंड उत्साहाचे वातावरण तयार झाले. मागील पाच दिवस सातत्याने आव्हानात्मक ध्येय गाठण्यासाठी, दाहक उन्हाच्या झळा सोसत, रात्रंदिवस एक करणार्‍या, सर्व अभियंता, अधिकारी आणि कामगारांच्या चेहर्‍यावरील थकवा, तणावाची जागा, विश्वविक्रमाच्या घोषणेनंतर आनंदाने घेतली.
 
 
 
अखेर अखंड तपश्चर्येनंतर मंगळवार, दि. ७ जून रोजी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी कामाची सांगता झाली. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने विश्वविक्रम झाल्याचे घोषित करताच, उपस्थित कामगार, कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या डोळ्यात अक्षरश: आनंदाश्रू तरळले. फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष झाला.’भारत माता की जय’, ’वंदे मातरम्’, ’जय भवानी जय शिवाजी’, ’राजपथ.... राजपथ... राजपथ.... ’असा जयघोष सर्वत्र निनादू लागला. यशाचे स्वप्न उराशी ठेवून, ‘बिटुमिनस काँक्रिटीकरणा’सह सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीचा हा नवा ’माईलस्टोन गाठला. ‘राजपथ इन्फ्राकॉन’ने भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, राष्ट्राला ही अनोखी भेट दिली. आता अकोला-अमरावतीचे, विदर्भ, महाराष्ट्र आणि भारताचे नाव यानिमित्ताने सातासमुद्रापार पोहोचले आहे. ‘गिनीज बुक’तर्फे राजपथचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी संपूर्ण माना कॅम्प परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने अक्षरश: दुमदुमून गेले.
 
 
 
या विक्रमी कामासाठी, प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सुरक्षितता अभियंता, सर्वेअर, इतर अनेक कर्मचारी आणि विविध सहयोगी कंपन्यांचे इंजिनिअर, कामगार याची निष्णात चमू अहर्निश तैनात होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, चार हॉट मिक्सप्लांट, चार व्हीललोडर, एक पेव्हर, एक मोबाईल फिडर, सहा टॅडेम रोलर, एक पीटीआर मशीन, १०६ हायवा, दोन न्यूमॅटिक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह अभियंते, पर्यवेक्षक, मदतनीस, कारागीर असे एकूण ७२८ योद्ध्यांचे, उच्च ध्येयाने प्रेरित, मनुष्यबळ इथे कार्यरत होते. स्थानिक लोकांसह भारताच्या सर्व भागांतून आलेल्या लोकांचा हा मिनी भारतच होता. कामावरील यंत्रसामग्री दोषरहित ठेवण्यासाठी ‘टाटा मोटर्स’, ‘रीटजेन’ आदी कंपन्यांचे पाच इंजिनिअर, तंत्रज्ञ आणि अन्य अधिकारी येथे सतत लक्ष ठेवून होते. निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहन देखभाल दुरुस्ती कक्ष, पेट्रोल व डिझेल पंप आदी इथे कार्यरत असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकूलित व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. या कामाचा दर्जा राखण्यासाठी आणि तो तपासण्यासाठी सुसज्ज दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा माना कॅम्पला उभारण्यात आलेली आहे. त्यानंतरच ३४ हजार मेट्रिक टन ‘बिटुमिनस’सह इतर सर्व साहित्य प्रत्यक्ष कामासाठी वापरण्यात आले.
 
 
गेल्या सहा महिन्यांत रस्त्याचे चार थर तयार करण्यात आले असून, विक्रमाच्या वेळी हा पाचवा थर टाकण्यात आला. या विक्रमाची नोंद करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘गिनीज बुक टीम’ने मंजूर केलेली २२ तज्ज्ञांच चमू तीन शिफ्टमध्ये अव्याहत कार्यरत होता. या तज्ज्ञांमध्ये सर्वेक्षक, अधिवक्ता, टाईम-कीपर, रस्ता अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि नामांकित महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांचा समावेश होता. या सर्व कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते देखरेख करीत होते.
 

 
नितीन गडकरींकडून अभिनंदन
 
 
अमरावती ते अकोलादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३वर (पूर्वीचे ६) लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी, ‘बिटुमिनस काँक्रिटीकरणा’सह सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीच्या कामाला दि. ३ जून रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी प्रारंभ झाला. त्याक्षणापासून अविरत, अखंड आणि अद्भुत अशा विक्रमी कामाची ७ जून रोजी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी सांगता झाली. त्यावेळी ८० किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली. यानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणीमंत्री, नितीन गडकरी यांनी दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधत सर्वांचे अभिनंदन केले.