वैदिक परंपरा आणि साधना

भाग-३८

    09-Jun-2022
Total Views | 74

kaliyamardan
 
 
 
यमुना म्हणजे काय व यमुनेचे जल काळेच का सांगितले आहे, याचे रहस्य आम्ही पाहिले आहे. आता त्या काळ्या यमुनेत असणार्‍या काळ्या कालियाचे रहस्य पाहू.
 
 
 
कालियामर्दन
 
 
यमुना म्हणजे काय व यमुनेचे जल काळेच का सांगितले आहे, याचे रहस्य आम्ही पाहिले आहे. आता त्या काळ्या यमुनेत असणार्‍या काळ्या कालियाचे रहस्य पाहू. भगवान व्यासांनी भागवत, महाभारतामध्ये योगसाधनेतील गूढ अनुभव मोठ्या खुबीने गुंफले आहेत.आपण त्यातील आशयसाधनेद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कालियाला महाप्रचंड जहरी सर्प मानून त्याच्या विषाने यमुनेचा परिसर दग्ध झाला होता, अशी कथा आपण ऐकतो. पण, वास्तविक ही कुंडलिनी जागृतीची कथा आहे. योगमार्गाची माहिती असणार्‍यांना हे माहीत आहे की, सुषुम्ना नाडीतूनच कुंडलिनी शक्ती वर जात असते. कुंडलिनी शक्तीला योगमार्गात कुंडल म्हणजे सर्पाची उपमा दिली आहे. ज्ञानेश्वरांनीसुद्धा सहाव्या अध्यायात कुंडलिनीला नागाच्या पिल्लाची व सर्पांची उपमा दिली आहे.
 
 
नागाचे पिले। कुंकुमे नहाले।
वळणे देऊनि आले। सेजे जैसे ॥ २२ ॥
तैसी ते कुंडलिनी । मोटकां औठेवळणी अधोमुख सर्पिणी।
निदैली असे ॥ २३ ॥
विद्युल्लतेची विडी। वन्हि ज्वाळांची घडी।
पंधरेयाची चोखडी। खोटी जैसी ॥ २४॥
 
 
 
वरील विवेचनावरून कुंडलिनी म्हणजेच सुषुम्नेतील कालिया नाग होय. हे बुद्धिमान साधकाला सांगण्याची आवश्यकता नसावी. सुषुम्ना म्हणजेच यमुना, म्हणून असा कुंडलिनी रूप कालिया नाग यमुनेत दडला होता. परंतु, तो कालिया इतका विषारी होता की, त्याच्या वास्तव्याने संपूर्ण यमुनाच नव्हे, तर यमुनेला धारण करणारी वृंदावनभूमीच विषाने दग्ध झाली होती, असे भागवतात वर्णन आहे. तेच वर्णन अधिक स्पष्टरूपाने ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलिनी जागृतीनंतर साधकाच्या शरीरात कसा विषमय दाह पसरतो, याचे काव्यमय वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात-
 
 
 
अस्थिंचे नळे निरपे। शिरांचे हीर वोरपे।
तंव, बाहेरी विरुढी करपे रोमबीजाची ॥३४॥
 
 
 
यावरून कुंडलिनी जागृतीमुळे, सर्वांगात गरळाप्रमाणे विषदाह उत्पन्न झाल्याप्रमाणे कुंडलिनी जागृत झालेल्या साधकाला जीव घेऊ अनुभव येतो. सुषुम्ना म्हणजे यमुनेत दडून बसणारा हा विषदाहरूप कुंडलिनी कालिया होय. त्याच्या विषाने म्हणजे भयंकर दाहाने यमुनेचा सर्व परिसर म्हणजे साधकाचे सर्व शरीरच (वृंदावन) विषाने दग्ध झाले होते. असल्या कुंडल कालियाला सुषुम्ना यमुनेतून बाहेर घालवून म्हणजे शांत करून आपले वृंदावन शरीर शांत करणे कृष्णरूप योग्याला आवश्यक असते. असल्या कालियाला यमुनेतून बाहेर घालविल्यावर म्हणजे कुंडलिनी शांत केल्यावर काय अनुभव येतात, याचे अनुभववर्णन ज्ञानेश्वरांच्या शब्दांतच पाहू - (अध्याय ६)
 
 
 
नातरी संध्यारागीचे रंग। काढूनि वळले ते आंग।
कि अंतर्ज्योतीचे लिंग। निर्वाळले ॥२५४॥
ते आनंदचित्रीचे लेप। ना तरी महासुखाचे रूप ।
कि संतोषतरूचे रोप। थांबले जैसे ॥२५६॥
हो काज शारदीयेचेनि ओले। चंद्रबिंब पाल्हैले का।
तेजचि मूर्त बैठले। आसनावरी ॥२५८॥
तैसे शरीर होये। जेव्हलि कुंडलिनी चांद्रपिये।
मगदेहाकृती बिहे कृतान्तु गा ॥ २५९ ॥
 
 
 
कालियामर्दनाची कथा अशी कुंडलिनी जागृत साधकावस्था होय. ती शांत करून आपले पिंडरूप वृंदावन त्या कुंडलिनी कालिया दाहापासून मुक्त करणे प्रत्येक कृष्णाचे काम असते. नागपंचमीचा सण याच कुंडलिनी जागृतीचे स्मरण होय. सर्व वैदिक सण असल्याच अतींद्रिय अनुभव शास्त्राची उजळणी होत.
 
 
कुब्जा
 
 
‘कु+अप्+जा’ हे तीन उपशब्द मिळून कुब्जा शब्द बनला आहे. ’कु’ म्हणजे वाईट, ’अप’ म्हणजे आपतत्त्व व ‘जा’ म्हणजे जन्माला आलेली काया वा शरीर होय. पृथ्वीतत्त्वातील जडशरीर आपतत्त्वातील घडामोडीतून प्राप्त होत असते, हे आपण पाहिले. कुंडलिनी जागृत झाल्यावर साधकाचे शरीर अतिशय सुंदर बनते. ज्ञानेश्वर असल्या योगशरीराचे वर्णन करतात.
 
 
 
तो कनक चंपकाचा कळा। कि अमृताचा पुतळा।
नाना सासिन्नला मळा। कोवळिकेचा ॥२५७॥
 
 
 
कृष्ण कुब्जेचा असा दिव्य प्रकाशमय ज्ञानमय समागम आहे.
 
 
राधाकथेतील योग आशय
 
 
ज्यांना यातील योगरहस्य ठाऊक नाही, असे इतरधर्मीय राधा-कृष्णाबद्दल विनाकारण अद्वातद्वा बोलतात. भागवतात असे वर्णन आहे की, राधा एक विवाहित स्त्री असून कृष्णासारख्या आठ वर्षांच्या चिमुरड्या पोरासोबत रासक्रीडा करीत असे. आठ वर्षांच्या बालकाचे शरीर समागमाकरिता पूर्ण झालेले नसते, शिवाय आमचे आदर्श भगवान श्रीकृष्ण अगदी बालवयापासून असे असतील, तर त्यांचा आदर्श समाजाने कसा मानावा, हा प्रश्न आहे. निदान आपण तरी यातील योगरहस्य समजून घेतले पाहिजे. समाधी अवस्था ही आठवी आहे. साधकाची पूर्वीची काया कुब्जा होती. आता ती काया साधनेद्वारे सुयोग्य झाल्यामुळे साधना करताना ज्या अनंत दिव्यशक्ती वा धारा साधकाच्या शरीरात वाहत असतात, त्या आता उलट म्हणजे राधा बनतात. त्यांना असल्या नवीन धारणा झालेल्या शरीरामुळे अडथळा वा त्रास होत नसतो. उलट कुंडलिनी जागृतीनंतर असल्या पुनर्रचित कायेमुळे साधना करताना साधकाला अतिशय आनंद होत असतो. राधा म्हणजे आनंद धारण करणारी, अशी ‘राधा’ शब्दाची व्याप्ती आहे. असली ‘राधाकाया’ श्रीकृष्ण साधकाची पूर्वीची नसते. ही ‘नवकाया’ राधा दुसर्‍या वृत्तीशी विवाहित असते. म्हणून राधाकृष्ण विवाहित नसतानासुद्धा एकमेकांवर अनुरक्त असतात. हा त्याचा खरा आशय आहे. (क्रमशः)
 
 
 
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
- योगीराज हरकरे
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121