‘विद्या’ विनयेन शोभते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2022   
Total Views |
 
vidya
 
 
 
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गोपाळनगर या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत विद्या दीपक कुलकर्णी या ३३ वर्षांच्या सेवेनंतर नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रवासाचा घेतलेला हा मागोवा..
  
विद्या यांचा जन्म लातूरमधील एका छोट्याशा गावात झाला. त्यांची आई अशिक्षित होती आणि वडील हे सरकारी वकील होते. त्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे बिर्‍हाड नेहमीच पाठीवर घेऊन या गावातून त्या गावात संसाराचा प्रवास ठरलेला. वडील सरकारी वकील असल्याने त्यांचे काम तसे जिकरीचे होते. तसेच त्यांचे वडील हे सतत कामात व्यस्त असायचे. त्यामुळे एकूण सहा भावंडांकडे आईचेच कटाक्षाने लक्ष असायचे. आपण शिक्षण घेतले नाही तरी आपल्या मुलांनी मात्र चांगले शिक्षण घ्यावे, असे त्यांच्या आईला वाटे. त्यामुळे विद्या यांच्या आईने आपल्या मुलांना नेहमी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. विद्या यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूरला झाले, तर पाचवी ते आठवीपर्यंतचे शिक्षण बार्शीला पूर्ण केले. पुढे आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पंढरपूरमधून पूर्ण केले. पदवी शिक्षणासाठी त्या पुन्हा आपल्या मूळगावी लातूर येथे दाखल झाल्या. ‘एम.ए’चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी परभणी येथे ’बी.एड’ केले. विद्या या ‘एम.ए’ला बोर्डात तिसर्‍या आल्या होत्या. विद्या यांना लातूरमध्ये हिंदी भाषा फारशी बोलली जात नसल्याने अहिंदी भाषीय शिष्यवृत्ती मिळाली होती. या शिष्यवृत्तीमुळे त्यांचे ‘एम.ए’चे शिक्षण मोफत झाले.
 
 
सहा भावंडं असल्याने पहिल्या बहिणीसाठी घेतलेली पुस्तके सर्व भावंडे जपून वापरत होते. विद्या यांच्या आई सर्व पुस्तके जपून ठेवत. त्याकाळी दहा वर्षांनी अभ्यासक्रम बदलत असल्याने एकदा खरेदी केलेल्या पुस्तकांत सर्व भावंडांचे शिक्षण होत होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्या यांनी ‘आर्ट टिचर डिप्लोमा’चेप्रशिक्षण घेतले होते. विद्या यांना ’एम.ए’ला ‘मेरिट’मध्ये आल्याने तसेच, ‘बीए.ड’ला ‘फर्स्ट क्लास’ मिळाल्याने त्यांना लातूर येथील मूकबधीर शाळेत नोकरी मिळाली. १९८९ मध्ये विद्या यांचा विवाह दीपक यांच्याशी झाला आणि त्या डोंबिवलीकर झाल्या. त्यांचे पती हे ‘मेकॅनिकल इंजिनिअर.’ डोंबिवलीत आल्यानंतर त्यांनी सिस्टर निवेदिता विद्यालय, अभिनव विद्यालय, गोळवलीतील विविधलक्षी विद्यालय अशा विविध शाळांमधून अध्यापनाचे काम केले. तसेच स्वामी विवेकानंद शाळेत त्या अर्धवेळ काम करण्यासाठी जात होत्या. स्वामी विवेकानंद शाळा अरूणोदय येथे १९९१ मध्ये त्यांना पूर्णवेळ कामावर रूजू करून घेतले. त्यावेळी त्या हिंदी, भूगोल आणि चित्रकला विषय आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवित असे.
 
 
विद्या या ‘एलिमेंटरी’ व ‘इंटरमिजिएट’ परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या व्यतिरिक्त वेगळ्या वेळेत वर्ग घेत असत. विद्या यांचे विद्यार्थी आता देशविदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांची नावे विद्या अगदी अभिमानाने सांगतात. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी नरेंद्र सावंत हे ‘अ‍ॅनिमेटर’ म्हणून काम करीत आहेत. पुष्कर रासम हे मालिकामध्ये काम करतात. सचिन भुसे हा दहावीला शाळेतून पहिला आला होता. तो सध्या अमेरिका विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. कपिल सानप हा दहावीत आदिवासी विभागातून प्रथम आला होता. तो सध्या न्यूजर्सीला स्थायिक आहे. जितेंद्र म्हात्रे हे हॉटेल व्यवसाय करीत आहेत. हे सर्व माजी विद्यार्थी आजही विद्या यांच्या संपर्कात आहेत. हिंदी हा विषय विद्यार्थ्यांकडून त्यांनी पक्का करून घेतला होता. त्यासाठी त्या हिंदी या विषयाच्या परीक्षादेखील घेत होत्या. विद्या यांची स्वामी विवेकानंद शाळेतील विविध शाखांमध्ये सतत बदली होत असे. त्यामुळे त्यांनी गोपाळनगर, दत्तनगर, अरूणोदय अशा विविध शाखांमध्ये काम केले आहे.
 
 
विद्या लहान असताना त्यांनी कुत्र्यांचे एक चित्र काढले होते. ते चित्र अत्यंत हुबेहुब असल्याने त्यांच्या काकांनी त्यांचे त्यावेळी कौतुकही केले. विद्या यांच्या घरात चित्रकलेचा वारसा नसतानाही त्या उत्तम चित्रे काढत असल्याने त्यांचे नेहमीच कौतुक होत असे. आपण उत्तम चित्रे काढू शकतो, असा आत्मविश्वास आल्याने विद्या नियमित चित्रे काढू लागल्या. त्यांच्या चित्रांची शाळेतदेखील प्रशंसा होत असे. शिक्षक वर्गातदेखील विद्यार्थ्यांना ती सगळी चित्रे दाखवित असत. बैलपोळ्याचे चित्र त्यांनी एकदा काढले होते. त्यात रंग भरण्यासाठी त्यांच्याकडे निळा रंग नव्हता. त्यामुळे घरातील नीळ वापरुन त्यांनी ते चित्र पूर्ण केले. याशिवाय विद्या यांना मणीकामाचीही आवड. घरी फावल्या वेळेत त्या आजही मणीकामात रमतात. विद्या यांचे पती मध्यतंरीच्या काळात १३ वर्षं कामानिमित्त दुबईला स्थायिक होते. त्याकाळात विद्या आणि त्यांची मुलगी अशा दोघीजणीच डोंबिवलीत राहत होत्या. पण, त्यांना कधीच असुरक्षित वाटले नाही. या डोंबिवलीने आपल्याला घडविले आहे, असे त्या प्राजंळपणे कबूल करतात.
 
 
विद्या यांना ‘रोटरी कल्ब’चे तीन ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ३३ वर्षांच्या सेवेनंतर त्या दि. ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
@@AUTHORINFO_V1@@