नवी दिल्ली : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाराष्ट्रातल्या मविआ सरकारला अखेरचा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेलेल्या याचिकेत आपल्या गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. हा पाठिंबा काढून घेतल्याने ठाकरे सरकरने बहुमत गमावले असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार हे स्पष्ट झाले आहे. आपल्याकडे शिवसेनेच्या ३८ आमदारांचा पाठिंबा असल्याने आपलाच गट हा शिवसेना पक्ष असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. त्यानुसार आपण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरु केली होती, तसेच शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती या दोन्ही गोष्टींना शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उपाध्यक्षांकडून आपल्या अधिकारांचा दुरुपयोग होतो आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेचे तसेच अपक्ष आमदार पकडून ५०च्यावर संख्याबळ आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
शिंदे गटाकडून दाखल केल्या गेलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात काय निकाल लागतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे, या निकालातून ठाकरे सरकारचे भवितव्य काय असणार हे ठरणार आहे. दरम्यान आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करूच असा दावा ठाकरे सरकारकडून केला जात आहे.