उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचे सल्लागार महत्वाचे वाटतात : केसरकर

    27-Jun-2022
Total Views |

Kesarkar Thackeray
 
 
 
मुंबई : "घरातून एखादा मुलगा बाहेर पडला तर त्या मुलाची समजूत काढली जाते. परंतु इथे उलट आहे. इथे आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे आधीच मार्ग काढला असता तर आघाडी सरकार टिकलं असतं. परंतु उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे सल्लागार महत्वाचे वाटतात.", असे शिंदेगटातील आ. दीपक केसरकर यांनी सोमवारी (दि. २७ जून) माध्यमांशी साधलेल्या एका संवादादरम्यान म्हटले. दरम्यान शिवसेना पक्षातील राजकीय भुकंपामुळे उद्भवलेल्या एकूण परिस्थितीवर केसरकरांनी आपले मत व्यक्त केले. 
  
 
"आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असून लवकरच महाराष्ट्रात येणार आहोत. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी. आघाडीतून बाहेर पडलो तर फ्लोअर टेस्टची गरज भासणार नाही आणि त्यामुळे लवकरच भाजप आणि शिवसेनेचे सरकार येईल.", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
राज्यात युती सरकार हवं होतं
"महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला भाजप आणि शिवसेना म्हणून एकत्र निवडूण आणलं होतं. मात्र शिवसेनेने आपली वेगळी चूल मांडली. जनमताच्या कौलाप्रमाणे राज्यात युती सरकार हवं होतं. त्यावेळी भाजपचे लोक रस्त्यावर आले नाहीत. त्यामुळे जनमताचा हा निर्णय मान्य केला पाहिजे", असे केसरकर यांचे म्हणणे आहे.