पाकिस्तानचा जगभरात सातत्याने अपमान होत असतो. पण, ‘गिरे तोभी टांग उपर’ हा पाकिस्तानचा राष्ट्रीय बाणा असल्याने काही विशेष झालेच नाही, असे पाकिस्तान नेहमीच वागत असतो. नुकतेच ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स’च्या विमानांना रशियाने आपल्या हवाई हद्दीत उडण्यास प्रतिबंध केला. पाकिस्तानने आधीचे शुल्क भरले नाही, असे रशियाचे म्हणणे. ‘पीके ७८१’ हे विमान २५० प्रवाशांना घेऊन टोरंटोच्या दिशेने निघाले. मात्र, रशियाने त्यांच्या देशाच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यास या विमानाला प्रतिबंध केला.त्यामुळे हे विमान इराण, तुर्कस्तान आणि युरोपमार्गे टोरंटोच्या दिशेने गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची अशी नाचक्की नेहमीच होत असते.
चीनच्या विळख्यात अडकून श्रीलंका हा देश तर पुरता आर्थिक दिवाळखोरीत गेला. नेपाळ, तिबेट, बांगलादेश वगैरे इतर छोट्या आशियाई देशांनाही अशाच प्रकारे कर्जप्रकरणातून गिळंकृत करण्यासाठी चीन टपला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर चीनला पाकिस्तानसारखा अशांत, अस्थिर आणि कर्जबाजारी देश आयताच मिळाला आहे. पाकिस्तानमध्ये उद्योगधंदे उभारू, असे आमिष दाखवत चीनने पाकिस्तानची मोक्याची बंदरं ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. कर्ज मिळते, उद्योगधंदे उभारले जातील आणि सगळ्यात मोठे चीनला सोबत घेतले, तर भारताला थोडा मनस्ताप देता येईल, असा पाकिस्तानचा हिशोब. ‘चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ अर्थात ‘सीपेक’ असे त्याला गोंडस नावही दिले गेले. चीनने पाकिस्तानी खनिज आणि नैसर्गिक संपतीवर कब्जा करण्यास हळूहळू सुरुवात केली. स्थानिक पाकिस्तान्यांना नोकरी देण्याच्या नावावर त्यांची साधनसंपत्ती लुबाडण्याला सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर चिनी संस्कृती लादण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये चीनला विरोधाचा असंतोषाचा सामना करावा लागला. चिनी नागरिकांवर आत्मघातकी हल्लेही झाले. थोडक्यात, सामान्य पाकिस्तान्यांना चीनचा अतिहस्तक्षेप पाकिस्तानमध्ये मंजूर नसावा. मात्र, पाकिस्तान वेगाने अधोगतीकडे जात असल्याने तिथल्या प्रशासनला नागरिकांचे काहीही देणेघेणे उरलेले नाही.
इथल्या प्रशासनाला सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कर्जाची भीती वाटत आहे. कारण, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की होत आहे. अर्थात, जगासमोर बेअब्रू होण्यापेक्षा भारत वेगाने प्रगती करत असताना आपली अधोगती होत आहे आणि हे भारताला समजत आहे, या विचाराने पाकिस्तान सैरभैर होत असणार. असो. हा केवळ तर्क आहे. मात्र, आधीचे कर्ज न फेडल्यामुळे नव्याने कर्ज मिळू शकत नाही, हे पाकिस्तानचे खरे दुःख. कर्जातून नव्हे, तर कर्जाच्या व्याजातून मुक्त होण्यासाठी पाकिस्तान धडपडत आहे. मात्र, कर्जमुक्तीसाठी जगभरातून पाकिस्तानला कुणीही साथ देत नाही. या पाश्वर्र्भूमीवर चीनसमोर हात पसरणे, हा मार्ग पाकिस्तानसाठी सोपा आहे. मात्र, चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा अशीतशी सहज मदत पाकिस्तानला करणार नाही. हे सगळे लक्षात घेता, पाकिस्तानमधील ‘काराकोरम नॅशनल मुव्हमेंट’चे अध्यक्ष मुमताज नागरी यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरचा हिस्सा असलेले गिलगिट-बाल्टिस्तान चीनला चक्क लिझवर देऊ शकतो. तसे पाहायला गेले, तर गिलगिट-बाल्टिस्तान हे सुरुवातीपासूनच किस्तानची डोकेदुखी आहे. कारण, गिलगिट-बाल्टिस्तानवाले पाकिस्तानपासून फुटून निघण्यासाठी सातत्याने संघर्ष करत असतात.
धर्माच्या नावावर स्वतंत्र देश म्हणून निर्माण झालेला पाकिस्तान आता आपल्याच देशातला भूभाग गहाण ठेवून जगत आहे. त्यातच पराकोटीची राजकीय अस्थिरता आणि फुटीरतावादाच्या ग्रहणाने या देशाला पुरते पोखरले आहे. त्यामुळे या देशाचे भवितव्य म्हणा वेगळे सांगायची गरज नाही. कारण, मुळात भविष्यात हा देश तरी नकाशावर एकसंध राहील की नाही, याचीच मुळी आज कोणी शाश्वती देऊ शकत नाही. खुद्द या देशाचे माजी पंतप्रधानइमरान खान यांनी तशी शक्यताही स्पष्टपणे बोलून दाखविली होतीच. त्यामुळे आर्थिक, भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय संकटाने ग्रासलेल्या या देशाचे जे व्हायचे तेच होईल. म्हणूनच एकंदरीतच विचार करता आज तरी पाकिस्तानचे भविष्य अंधकारमयच आहे.