मुंबई: विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पाटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसच्या सगळ्या आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पाटोले यांनी सगळ्यात शेवटी मतदान केले. या निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला तडा जाणार असून "काँग्रेसमध्ये आनंदच आनंद आहे" असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
काँग्रेसला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी एकूण ८ मतांची गरज आहे . सध्या भाजप आणि काँग्रेस उमेदवारांना विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांची मदार ही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांवरच अवलंबून आहे. त्यामुळे अपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप व मविआमध्ये रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपली अतिरिक्त मतं शिवसेनेकडे वळती न केल्याने सेनेला पराभव पत्करावा लागला असल्याच्या चर्चा आहेत.
मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेची अतिरिक्त मतं शिवसेनेचे आमदार काँग्रेसला देणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीबद्दल प्रश्न विचारल्यावर, काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून "आमचा कोटा ठरवून मतांचं योग्य समीकरण जुळवलंय" त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, अशी ,माहिती नाना पाटोले यांनी माध्यमांना दिली.