वेदातील पर्यावरण

    20-Jun-2022
Total Views | 226
 पर्यावरण
 
 
 
 
पर्यावरणाचे होणारे नुकसान, ही आधुनिक जगाची मोठी समस्या आहे. पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे ही संपूर्ण जगाची ज्वलंत समस्या आहे. त्यासाठी आज देशच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था कार्यरत आहेत. परंतु,पर्यावरणाच्या संगोपनाबद्दल आणि संरक्षणाबद्दल आपला वैदिक इतिहास आणि आपले वैदिक साहित्य काय सांगते याचा ऊहापोह करणारा हा लेख...
 
 
पर्यावरणाच्या संरक्षणाची ही संकल्पना खरंच इतकी आधुनिक आहे का? का आपण भारतीय प्राचीन काळापासून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व जाणतो? तुम्हाला आज पर्यावरणाच्या संगोपनाबद्दल आणि संरक्षणाबद्दल आपला वैदिक इतिहास आणि आपले वैदिक साहित्य काय म्हणते ते मी सांगू इच्छितो. वैदिक वाङ्ङ्कयाचा अभ्यास करता आपल्याला असे आढळून येते की, वैदिक काळातील समाज पर्यावरणाच्या रक्षणाची गरज जाणून होता व तो तत्कालीन पर्यावरणाची खूप काळजी घेत होता. मात्र गेल्या दोन ते तीन शतकांत, दुर्दैवाने औद्योगिक विकासाच्या नावाखाली आपल्या पर्यावरणाचा अत्यंत भयानक र्‍हास झाला आहे. प्राचीन वेदांमध्ये पर्यावरण संरक्षण, पर्यावरणीय समतोल, हवामान चक्र, पर्जन्यघटना, जलविज्ञान चक्र आणि अशा अनेक संबंधित विषयांवर संदर्भ आहेत, जे थेट त्या काळातील लोकांच्या उच्च स्तरावरील जागरूकता व दूरदर्शिता दर्शवतात.
 
 
 
‘पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986’, पर्यावरणाची व्याख्या सांगतो की, ’पर्यावरणात पाणी, हवा आणि जमीन ङ्मांचे एकमेकांशी व मानव, इतर सजीव प्राणी, वनस्पती, सूक्ष्म जीव इ. यांच्यातील आंतरसंबंधांचा समावेश होतो. वरील व्याख्येवरून असे थोडक्यात म्हणता येईल की, पर्यावरणामध्ये जैविक (सजीव) आणि अजैविक (निर्जीव पदार्थ) घटक या दोन घटकांचा समावेश होतो. अथर्ववेदामध्ये (पृथ्वीसूक्त, श्लोक 12), वैदिक द्रष्टा गंभीरपणे पृथ्वीमातेशी मानवजातीची अखंड निष्ठा घोषित करतो की, ‘माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः।’ अर्थात, ‘पृथ्वी माझी आई आहे, मी तिचा पुत्र आहे.’ यावरुन समजले जाऊ शकते की, वैदिक समाज हा पर्यावरणप्रेमी व पर्यावरणरक्षणासाठी दक्ष होता. वेदामध्ये आपल्याला अशी संकल्पना आढळते की, जगातील प्रत्येक वस्तूमध्ये जीवन आहे. मग ते सजीव असो किंवा निर्जीव. वेदाची सुरुवात निसर्गदेवतांच्या उपासनेने होते, उदा. पृथ्वी, अग्नी, बृहस्पती आणि सोमसारखे ऐहिक देव व इंद्र, रुद्र, मरुत्, वायू आणि पर्जन्यसारखे वायुमंडलीय देव आणि वरुण, उषा आणि अश्विन सारखे आकाशीय देव. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, वैदिक काळात मानवजातीला त्यांच्या सभोवतालची स्पष्ट संकल्पना होती.
ऋग्वेदाच्या आधारे देवता उदा. मित्र, वरुण, इंद्र, मरुत आणि आदित्य, निसर्गाच्या सर्व घटकांच्या कार्यामध्ये संतुलन राखण्यासाठी जबाबदार आहेत. अर्थात, पर्वत, तलाव, आकाश आणि पृथ्वी, जंगल किंवा पाणी. इंद्र, सूर्य आणि अग्नी हे हवेतील जल, उष्णता, प्रकाश आणि अग्नीचे स्रोत आहेत. त्याचप्रमाणे पहाट, वारा, इतर निसर्गातील शक्तीचे एकत्रित स्वरूप आणि काही नैसर्गिक घटना उषा, वायू आणि मरुत इत्यादींच्या रूपात व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
वेदांचा अभ्यास करता असे सहज उमजते की, वेदांच्या मते अविवेकी मानवी कृतींमुळे निसर्गात कोणताही बदल झाल्यास हवामान आणि पर्जन्याची रचना बदलू शकते. तसेच पृथ्वी, हवा आणि पाणी प्रदूषित होऊ शकते. निसर्गाच्या पाच स्थूल घटकांचा अर्थात पंचमहाभूतांचा आशीर्वाद मिळवणारी अनेक स्तोत्रे वेदांमध्ये सापडतात. निसर्गाला हानी पोहोचवणार्‍या कोणत्याही कृतीपासून लोक स्वतःला दूर ठेवत होते व पृथ्वीमातेचे रक्षण हे पर्यावरणाचे रक्षण आणि पालनपोषणावर अवलंबून आहे, असे त्याकाळातील सभ्यतेला ठाऊक होते, असे वेदांच्या अभ्यासावरुन सांगता येते.
 
 
आधुनिक संस्कृतमध्ये ‘पर्यावरण’ हा शब्द वापरला जातो. पण अथर्ववेदात या अर्थाशी निगडित असे अनेक शब्द वापरले आहेत. जसे वृतावृत्ता, अभीवार:, आवृत्ता, परिवृत्ता: इ. पर्यावरणावरील वैदिक दृष्टिकोन अथर्ववेदाच्या एका श्लोकात चांगल्या प्रकारे परिभाषित केला आहे. जिथे आपल्या सभोवतालच्या तीन आवरणांना छंदांमध्ये असे संबोधले जाते की, ‘शहाणी व्यक्ती तीन घटकांचा विविध प्रकारे उपयोग करते. हे घटक म्हणजे पाणी, हवा आणि वनस्पती आहेत. हे घटक अगदी सुरुवातीपासून जगात अस्तित्वात आहेत, असे पर्यावरणाच्या मूलभूत घटकांबद्दल वैदिक द्रष्टे ज्ञान सिद्ध करतात.
 
 
वेद ऋतुचक्रांच्या समतोलाचे व देखभालीचे महत्त्व दर्शवतात. अभ्यासानंतर हे लक्षात येते की, वैदिक कालखंडातील लोक निसर्ग आणि पर्यावरणाचा समग्रपणे विचार करायचे आणि त्याच्या प्रत्येक घटकाचा काळजीपूर्वक विचार करून आदर करायचे. निसर्ग आणि जमीन, पाणी, डोंगर यासारख्या सर्व नैसर्गिक संसाधनांचा तसेच वनस्पती, प्राणी इ. चा आदर करणे, हा वैदिक तत्त्वज्ञानाचा पहिला संदेश होता. वैदिक साहित्यात पर्यावरणाला अनुकूल निवासस्थान मानले गेले आहे. पृथ्वीच्या अतिशोषणास कारणीभूत असलेल्या कोणत्याही कृत्यासाठी द्रष्ट्यांनी वेदांत प्रार्थना केलेली आढळते की, ’हे पृथ्वी, मी तुला जी इजा पोहोचवली आहे, ती लवकर बरी होवो. हे शुद्ध करणारे शक्ती, आम्ही तुझे जीवन किंवा तुझ्या हृदयाला कधीही इजा पोहोचवू नये (ही प्रार्थना)’ (स्तोत्र 12, श्लोक 34, अथर्ववेद, पृथ्वीसूक्त). वैदिक कालखंडातील मजकुराने नेहमीच पाण्याच्या संवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. त्याच्या अपरिहार्य स्वरूपामुळे ते दैवत मानले गेले आहे. खालील ऋग्वेदातील श्लोक (तखख: 49:2) प्रार्थना करतो की, ‘स्वर्गातील पाणी, झर्‍याचे पाणी, तेजस्वी शुद्ध पाणी जे समुद्राकडे वाहते, हे दैवी पाणी आमचे रक्षण करोत.’ जीवनासाठी पाण्याचे महत्त्व वैदिकद्रष्ट्यांना चांगलेच ठाऊक होते. आपल्याला खालील स्तोत्रातून समजू शकते की, वैदिक काळात जलचक्र माहीत होते. अथर्ववेदाचा हा श्लोक बघा, ‘महासागरापासून ते आकाशापर्यंत पाणी उचलले जाते, व आकाशातून पृथ्वीवर ओतले जाते. (अथर्ववेद 4:27:4).
 
 
वेदांत पाणी हे सर्व वनस्पतींचे मूळ आहे आणि उत्तम आरोग्य देणारे आहे तसेच पाणी सर्व प्रकारचे रोग नष्ट करते, असे नमूद केलेले आहे व म्हणून त्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे, असे वेद सांगतात. प्राचीन भारतीयांनी पाणी हे जीवनासाठी महत्त्वाचे घटक म्हणून ओळखले होते असे वेदांच्या अभ्यासावरून स्पष्ट दिसून येते. पर्यावरण संरक्षणाबद्दलची वेदांतील भूमिका दर्शवण्यासाठी ‘पाणी’ हे एक उदाहरण झाले फक्त. असे असंख्य पाण्यासंबंधीचे दाखले वेदांत सापडतात. तसेच इतर पर्यावरणातील घटकांवर अनेक श्लोक वेदांत आहेत. वनस्पती जीवनाविषयी जागरुकतेच्या संदर्भात ऋग्वेदातील एक श्लोक अतिशय समर्पक आहे. यात वनदेवतेची मानवजातीला दिलेल्या भेटवस्तूंबद्दल आणि तिच्या मोहकतेबद्दल स्तुती करण्यात आली आहे (ऋग्वेद 10:146). श्लोक सांगतो की, झाडे-वनस्पतींनी जंगल हिरवेगार ठेवावे, अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. ऋग्वेदातील औषधी सूक्त, वनस्पती आणि भाज्यांना ‘आई’ म्हणून संबोधित करते, ‘हे माते! तुझी शेकडो जन्मस्थाने आणि हजारो अंकुर आहेत’ (ऋग्वेद, 10.97.2). खूप ठिकाणी ऋग्वेदात जंगले नष्ट करू नयेत, असा सल्ला दिलेला आहे व पर्यावरणात जंगलांचे महत्त्व सांगितलेले आहे. (ऋग्वेद, 8.1.13).
 
अशी अनेक उदाहरणे आहेत. वेदांत पर्यावरणासंबंधी उल्लेख आणि संदेश अनंत आहेत. सगळे नमूद करत बसलो, तर या लेखाचा अंत होणे शक्य नाही. बहुदा, इतर अनेक असे उल्लेख सांगायला लेखांची शृंखला करावी लागेल. असो, शेवटचे पण महत्त्वाचे एक उदाहरण देतो. वेदांतील द्रष्टे पृथ्वीच्यावतीने म्हणतात की, ‘तू मला देतो आणि मी तुला देतो’ व पुढे म्हणतात की, यानेच निसर्ग स्थिर राहील. ते निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडे मित्रत्वाने आणि सहानुभूतीने पाहतात. यजुर्वेदातील श्लोक ‘मित्रस्याहं चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षे, मित्रस्य चक्षुषा समीक्षामहे’(यजुर्वेद 36:18) सांगतो की, ‘(हे परमात्मा!) तू मला असे बनव की, सगळे जीव मला मित्राच्या दृष्टिकोनातून बघतील आणि मी सगळ्यांना मित्राच्या दृष्टिकोनातून पाहू शकेन.’ सूर्याच्या हानिकारक किरणांना अडवून पृथ्वीचे संरक्षण करणार्‍या ओझोनचा थर म्हणून आता आपल्याला माहीत असलेल्या संरक्षणात्मक थराच्या उपस्थितीचा ऋग्वेद स्पष्ट उल्लेख करतो आणि वातावरणात प्रवेश करणार्‍या जीवन प्रोत्साहक ऊर्जेची स्तुती करतो. ऋग्वेदाच्या एका स्तोत्रात द्रष्टा अश्विनांना पृथ्वीच्या तापमानावरही परिणाम करणार्‍या कोणत्याही अत्याधिक सौरज्वलनापासून संरक्षणासाठी प्रार्थना करतो. अर्थात, वेदांतील काळातदेखील, आपली पर्यावरणासंबंधित माहिती बिनचूक होती, हे स्पष्ट दिसते.
वर म्हटल्याप्रमाणे उदाहरणे आणि उल्लेख अनंत आहेत. वेदांतील काळातदेखील पर्यावरण संरक्षण, पर्यावरण दक्षता आणि पर्यावरणचे महत्त्व सर्वश्रुत होते, यात वादच नाही. याच वेदाचा आधार घेऊन आपण या काळात पर्यावरणसाठी काही करू शकतो का, हा वैयक्तिक चर्चेचा विषय आहे नक्कीच. विचार करा!
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121