नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली ३ जून रोजी, लखनऊमध्ये तिसरा ग्राउंड ब्रेकिंग सोहळा आयोजित होणार आहे. या सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत. या कालावधीत राज्यात ८०,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. राज्यातील सुमारे १,४०६ कंपन्या भूमिपूजन समारंभात सहभागी होणार आहेत. या माध्यमातून, ५०० कोटींपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या ३० कंपन्या एकूण ४३,९०६ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.
त्याच वेळी, १०० ते ४९९ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या १०८ कंपन्या २४,०२८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या गुंतवणुकीमुळे, १४०० हून अधिक प्रकल्प पूर्ण होतील. उत्तर प्रदेशाला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेपर्यंत पोहचवायच्या योगींच्या या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी, हा प्रकल्प महत्वाचा मानला जातोय. याअंतर्गत राज्याचे डेटा सेंटर, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन्युफॅक्चरिंग, हॅण्डलूम आणि टेक्सटाईल, रिन्युएबल एनर्जी, एमएसएमई, हाउसिंग आणि कमर्शियल, हेल्थ केअर, वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक, डिफेन्स आणि एरोस्पेस फार्मास्युटिकल आणि मेडिकल सप्लाय, शिक्षण. दुग्धव्यवसायासह अनेक क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी अनेक योजनांची पायाभरणी करणार आहेत.