नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अशोभनीय वक्तव्य केले बाबत तसेच महाराष्ट्रात दोन समाजांमधील वितुष्ट निर्माण करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचे काम करणाऱ्या दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नाशिक यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार वाडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली.
यावेळी आ. देवयानी फरांदे यांच्यासह महा. प्रदेश महिला मोर्चा चिटणीस रोहिणी नायडू, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आहेर-आडके, नाशिक महानगर चिटणीस छाया देवांग, प्रदेश महिला मोर्चा सदस्य सोनाली कुलकर्णी, प्रदेश महिला मोर्चा सदस्य स्मिता मुठे, भाजप मध्य मंडलाच्या महिला मोर्चा अध्यक्ष ललिता बिरारी, संगीता जाधव, करुणा गायकवाड, शोभा जाधव, अँड. दिपाली भूमकर, वसंत उशीर, अँड. शाम बडोदे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर फिर्यादीत दीपाली सय्यद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानाचा निषेध करताना दीपाली सय्यद यांच्याकडून गेल्या महिन्याभरापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बेताल वक्तव्य केले जात असल्याचे नमूद करून, हा मोठ्या कटाचा भाग असल्याचे स्पष्ट करताना यामागे मोठ्या प्रमाणावर समाजकंटक असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी शरद पवारांबाबत चुकीचे व्यक्त केले म्हणून केतकी चितळे ला अटक केली जाऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला म्हणून खासदार नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तर दीपाली सय्यद यांना वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित करून दिपाली सय्यद यांना तत्काळ अटक करण्यात येऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास साठी तयार करण्यात आलेल्या षड्यंत्रातील अंध गुन्हेगारांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली.