धर्म-देवस्थानांच्या रक्षणासाठी...

    14-Jun-2022   
Total Views |

mans
धर्मच समाजाचे आणि माणसाचे रक्षण करू शकतो, यावर ठाम श्रद्धा आणि खात्री असलेले अ‍ॅड. राजेश मुधोळकर भारत आणि शेजारील देशांमध्ये हिंदू धर्म आणि श्रद्धेतून एकतेचे कार्य करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...
 
 
'देवस्थान समन्वय रक्षण व जीर्णोद्धार समन्वय’ संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. राजेश मुधोळकर हे ‘रेड स्वस्तिक सोसायटी इंटरनॅशनल’चे कॉर्डिनेटर असून इंडोनेशिया या देशातील ‘पुस्कोर’ या संस्थेचे प्रवर्तकही आहेत. ‘पुस्कोर’ म्हणजे स्थानिक इंडोनेशियाच्या भाषेत ‘पुसात कोअरीदिनाती हिंदू.’ याचा अर्थ आहे ‘हिंदू समन्वय केंद्र.’ इंडोनेशियामध्ये ९५ टक्के मुस्लीम आणि पाच टक्के हिंदू जनसंख्या आहे. ही हिंदू जनसंख्या बाली बेटावर एकवटलेली आहे. मात्र, आता त्या बाली बेटावरही हिंदू समाजाचा टक्का कमी होत आहे. इथे इंडोनेशियाऐवजी ‘हिंदूनेशिया’ हा शब्दप्रयोग हिंदूंच्या मनात रूजवणे, हिंदू देवस्थान आणि धर्माचा प्रसार करणे, तिथे खर्‍या अर्थाने हिंदू श्रद्धा आणि धर्मभावना टिकवून ठेवणे, यासाठी अ‍ॅड. राजेश प्रयत्नशील आहेत. इंडोनेशियासारख्या मुस्लीमबहुल देशामध्ये हिंदुत्वाचा वारसा राखून ठेवण्यासाठी अ‍ॅड. राजेश मुधोळकर हा भारताचा सुपूत्र खर्‍या अर्थाने तन-मन-धन अर्पण करत आहे. भारतात पश्चिम बंगालमध्ये माल्दामध्येही दिपांकर रजक या बांधवाच्या सहकार्‍याने त्यांनी जिल्हा देवस्थान समन्वय समिती गठीत केली.
 
 
माल्दामध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले. तिथलीदेवस्थानाची परिस्थिती बिकट झाली. काही मंदिरं ढासळलेली जीर्णशीर्ण झालेली. या मंदिरांचा जीर्णोद्धार होणे आवश्यक आहे, नाहीतर तिथली सामाजिक, राजकीय परिस्थिती पाहता या ठिकाणी पूर्वी कधी मंदिरं होती हेसुद्धा शोधावे लागेल, असे माल्दा जिल्ह्यातल्या दिपंकरचे म्हणणे होते. दिपकंरने आपले मत अ‍ॅड. राजेश यांच्याकडे व्यक्त केले. अ‍ॅड. राजेश यांनी तातडीने पश्चिम बंगालचा दौरा केला. तिथे जिल्हानिहाय मंदिरांची अवस्था काय आहे, याची पाहणी केली. अर्थात हा काही शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फतचा अभ्यास दौरा नव्हता, तर हा दौरा केवळ आणि केवळ अ‍ॅड .राजेश यांच्या हिंदू धर्म, श्रद्धा, प्रेमासाठी होता. हिंदू धर्माची ध्वजशिखा असलेल्या मंदिरांच्या सुरक्षिततेच्या अध्ययनासाठी होता. त्यांनी कायदे मराठी भाषेतून लोकांना समजावेत यासाठी ‘मनाई हुकूम’ आणि ‘नुकसान भरपाईचे कायदे’ ही दोन पुस्तके लिहिली. त्याचबरोबर ‘देवस्थान समन्वय रक्षण व जीर्णोद्धार’हे पुस्तकही लिहिले.
 
 
राजेश यांचे वडील प्रल्हाद हे न्यायाधीश होते, तर आई वसुधा या ‘होमियोपॅथी’ डॉक्टर. घरी अत्यंत सुसंस्कृत आणि धार्मिक वातावरण होते. इयत्ता पहिलीपासूनच्या बालवयातच राजेश रा.स्व.संघाच्या शाखेत जाऊ लागले.देव, देश आणि धर्माबाबतचे बाळकडू संघशाखेतून मिळत गेले. त्यातच राजेश यांना वाचनाचा छंद होता. ‘मोपल्याचे बंड’, ‘श्रीमान योगी’ वाचताना त्यांच्या डोळ्यांसमोर इतिहास जीवंत होत होता. याच काळात समर्थ रामदास स्वामींचे दासबोध वाचले. परकीय क्रूर आक्रमकांचे आक्रमण समाज-धर्म स्थितीचे वर्णन वाचून राजेश यांच्या मनात त्यावेळीही प्रश्न उभा राहिला की, हे मुघल आणि इतरही मुस्लीम आक्रमणकर्ते मंदिरावरचका हल्ला करत? त्यावेळी विचारांती त्यांना समजले की, याच ठिकाणी समाजाला सकारात्मकतेने एकत्र ठेवण्याची शक्ती मंदिरामध्ये आहे. धर्मप्रतीक श्रद्धा समाजाला नैतिक धैर्य देतात, निराशेवर मात करण्याची मानसिक उभारी देतात. हिंमत देतात. त्यामुळेच देवस्थान ही समाजाची बलस्थान आहेत.
 
 
या वैचारिक जडणघडणीतून राजेश यांच्यावर संस्कार घडत होते. लहानपणापासून त्यांना धर्मप्रसारक होण्याची इच्छा हेाती. राजेश यांनी ठरवले की, पहिल्यांदा शिक्षण पूर्ण करायचे. तर्क सुसंगतपणे मांडता यावेत म्हणून त्यांनी पहिल्यांदा विज्ञान शाखेतून पदवी घेतली आणि मग कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. वकिली पेशात जम बसवतानाही ते त्यांचे ध्येय विसरले नव्हते. ते देशभ्रमंती करत. देवस्थान आणि समाज परिस्थितीचा अभ्यास करत. त्यातूनच देवस्थानांच्या एकत्रिकरणासाठी आणि जीर्णोद्धारासाठी त्यांनी संस्था निर्माण केली. नुकतेच महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त मुंब्रा शिवमंदिरामध्ये पूजा आणि प्रसाद वितरणाचा कार्यक्रम होता. मात्र, त्यावेळी तिथे दहशतवादी विघातक शक्तींच्या माध्यमातून घातपात होऊ शकतो, अशी भीती परिसरातील भाविकांना होती. मात्र, या परिसरात हिंदू अत्यल्पसंख्याक. तसे काही घडले तर तत्काळ काय करायचे? पोलीस कायदा-सुव्यवस्था प्रशासन यांचे सहकार्य समन्वय होणे गरजेचे होते. त्यावेळी अ‍ॅड. राजेश मुधोळकर यांनी पुढाकार घेतला. मुंब्र्यामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव पावित्र्याने आणि तितक्याच जल्लोषात साजरा झाला.
 
 
या पार्श्वभूमीवर मुंब्र्यामधील सर्वच देवस्थानांचे आणि मंदिर संस्थांचे एकत्रिकरण करण्याचे कार्य अ‍ॅड. राजेश करत आहेत. हे एकत्रीकरण का? तर या परिसरात मंदिरं तर आहेत, मात्र पूजाअर्चा आणि उत्सव करण्यासाठी लोकच नाहीत. त्यामुळे या मंदिराच्या आणि त्यामधील देवमूर्तींच्या पावित्र्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे मुंब्र्यातील सर्वच देवस्थानं आणि भाविक एकत्र झाले, तर ते तिथल्या सर्वच मंदिरांच्या सुरक्षितता आणि एकंदर दैनंदिन पूजेअर्चेसंदर्भात काम करू शकतात. मुंब्राच नव्हे, तर विक्रमगड येथील वनवासी भागात वनवासी समाजाच्या धार्मिक, सामाजिक एकतेतून त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठीही ते काम करतात. विक्रमगड जवळ साखरा गावी त्यांनी विठ्ठल-रखुमाईचे मंदिर बांधले, तर ढाढरा गावात हनुमंताचे मंदिर बांधणार आहेत. उद्देश काय तर? या मंदिराच्या पूजाअर्चा उत्सवाच्या उद्देशाने गावातले लोक एकत्र येतात. याच मंदिरामध्ये आरोग्य कॅम्प, विविध सामाजिक प्रश्नावर जागृती, असे अभियानही सुरू आहेत. आपण मदरसा किंवा चर्चमध्ये एकत्रित होणार्‍या समुदायाबद्दल बोलतो ऐकतोही. मात्र, आपल्या धार्मिक वास्तूमध्ये समााजच्या एकत्रिकरणाचे प्रयत्न करणारे अ‍ॅड. राजेश मुधोळकर यांचे कार्य अद्वितीय आणि महत्त्वाचे आहे. स्वयंप्रेरणेने धर्मकार्यासाठी सज्ज असलेल्या अ‍ॅड. राजेश मुधोळकर यांच्या कार्याला वंदन!
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.