मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे अनेक भूखंड मुंबईत वापराविना पडून आहेत. या जागा विकासकामे, आरोग्यसुविधा तसेच शिक्षण यासाठी न देता केवळ नशेबाजांसाठी आहेत का? असा सवाल आता मुंबईकर उपस्थित करत आहेत. तसेच, या नशेबाज टवाळखोरांच्या त्रासामुळे महिला सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. अशीच अंधेरीतील मरोळ, नेहरुनगरमधील पाणीपुरवठा करणारी मोठी पाईपलाईन आणि मुंबई महानगरपालिकेची बंद असलेली इमारत ही नशेबाज आणि गर्दुल्यांचा अड्डा बनली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
याभागात पाहणी केली असता ही इमारत जलअभियंता विभागाच्या मालकीची असल्याचा फलक गेटवर लावलेला आढळला. तसेच या इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही यावर लिहिलेले आहे. मात्र, या इमारतीचे गेट खुले असून पालिकेचा सुरक्षारक्षकही त्याठिकाणी नव्हता. आतमध्ये नशेच्या गुंगीत अनेक माणसे झोपलेली होती. अनधिकृतपणे काही गंजलेल्या अवस्थेतील टॅक्सीदेखील याठिकाणी लावण्यात आलेल्या होत्या.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच गेटला लागूनच एक खोली बांधण्यात आली. परंतु, अद्याप ती वापराविना पडून आहे. याठिकाणी तसेच, पाईपलाईनच्या आडोशातही रात्रीच्या वेळेस नशेबाज, दारू पिणारे येऊन गोंधळ घालत असतात. पोलिसांच्या धाकाने काहीवेळा ते तात्पुरते निघून जातात. मात्र, पुन्हा तिथे येऊन बसतात.
परिसरात येऊन दमदाटी
इथे आमच्या वस्तीवरचे नाही, तर बाहेरून येऊन लोक दमदाटी करतात. दारुड्या लोकांचा आम्हाला खूप त्रास आहे. आमच्या घरासमोरच ते गोंधळ घालतात. काही बोलले तर शिवीगाळ करतात. मागे एका महिलेला मारायला काही टवाळखोर आले होते. पोलीस आले की, थोडेफार हाकलून वगैरे देतात. नंतर पुन्हा इथे येऊन बसतात.
- स्थानिक महिला