ठाणे : मानधन, पेन्शन, मोबाईल व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने येत्या २० जुन ते २५ जून या कालावधीत यवतमाळ ते अमरावती असा १०० किलोमीटरचा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तसेच राज्य सरकार व प्रशासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळी नाद आंदोलन करून आक्रोश करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका या आक्रोश आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ करू व त्यांच्या सेवाशर्तीत सुधारणा करू, असा लेखी वचननामा आघाडी सरकारने जाहीर केला होता. परंतु अडीच वर्षाचा काळ उलटून सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न महाविकास आघाडी सरकारने सोडविले नाहीत. तेव्हा या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळी नाद आंदोलन केल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी सांगितले.