एखादी गोष्ट ध्यानीमनी नसताना घडते आणि ती स्वीकारायला आपल्याला अवधी सुद्धा मिळत नाही. आपले एखाद्या व्यक्तीशी नाते रक्ताचे जरी नसले , एवढेच काय कदाचित त्या व्यक्तिला आपले अस्तित्व देखील माहित नसले तरी त्याचे अकस्मात हे जग सोडून जाणे आपल्याला अस्वस्थ करते, दुःख देते. आणि असाच एक कलाकार ज्याने आपल्या सुरांतून फक्त भारतीयांच्याच नव्हे तर जगाच्या ज्या कोपऱ्यात रसिक आहे, रसिक मन आहे त्यांच्या मनात ध्रुवताऱ्याप्रमाणे स्थान निर्माण केलेला कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच 'केके' याने या जगातून निरोप घेतला. काल म्हणजे ३१ मे २०२२ ला कोलकाता येथे रात्री केके ची लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना अचानक त्याला अवस्थ वाटू लागले , त्याचा कार्यक्रम संपल्यानंतर त्याची तब्येत आणखी बिघडली आणि तो जामिनावर कोसळला, पण हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंतच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वयाच्या ५३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.
केके चा जन्म केरळ मध्ये झाला. परंतु, ते आपले वडील सी.एस नायर आणि आई कनाकवल्ली यांच्या सोबत दिल्लीमध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांचे शिक्षण सुद्धा पूर्ण झाले. लहानपणापासूनच त्याला गाण्याची आवड होती. साधारण दुसरीत असताना जेव्हा त्याने गाणे म्हटले होते तेव्हा त्याच्या आवाजाची भुरळ सर्वांवर पडली होती. आणि तेव्हापासून ते साधारण गायनक्षेत्रात त्याला मोठा ब्रेक मिळेपर्यंत त्याने अनेक जाहिरातींना आपला आवाज दिला. त्याने जवळपास ११ भारतीय भाषांमध्ये जिंगल्स म्हटल्या . ब्रिटानिया, अमूल, पेप्सीची 'ये दिल मांगे मोर' अशा जवळपास ३५०० ऍड्सना त्याने आपले स्वर दिले. दिल्ली मध्ये आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्याने काही महिने तिथे काम देखील केले. परंतु, शैक्षणिक अभ्यासात न रमता तो आपले करिअर घडविण्यासाठी स्वप्ननगरीमध्ये म्हणजे अर्थातच मुंबईत आला. आणि पहिलीच संधी त्याला मिळाली ती गुलझार यांच्या 'माचीस' चित्रपटात गाण्याची ; या चित्रपटातील 'छोड आये हम ' पासून त्याचा या क्षेत्रात प्रवास सुरु झाला आणि त्या नंतर फक्त हिंदी चित्रपटसृष्टीलाच नाही तर अनेक भाषांमधील चित्रपटांकरता त्याने गाणी म्हटली. १९९९ साली झालेल्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय टीमसाठी त्याने 'जोश ऑफ इंडिया' हे गाणे म्हणून आपल्या टीम सह सर्वांनाच प्रोत्साहन दिले.

आपण कोणतेही गाणे गुणगुणावे आणि ते केके चे असावे एव्हढा त्याच्या गाण्यांचा आपल्यावर प्रभाव आहे. म्हणजे त्याचे 'यारो दोस्ती बडी हि हसीन है' आपण मैत्रीला डेडीकेट करतो , 'तू हि मेरी शब है' किंवा 'आंखो मै तेरी' म्हणत प्रेमाची कबुली देतो, तर प्रेमभंग झाल्यावर ते दुःख व्यक्त करत 'तडप तडप के इस दिल से..' किंवा 'सच केह रहा है दिवाना' आपण म्हणतो . अशी किती त्याची गाणी सांगावीत? कालपर्यंत आपल्या ह्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण त्याची गाणी गुणगुणत होतो पण आज हीच त्याची सगळी गाणी 'गाय फ्रॉम ब्लूटूथ एरा' म्हणत त्याच्या चाहत्यांनी त्याला आदरांजली म्हणून, त्याच्या जाण्याचे दुःख कायम असेल असे म्हणत सर्व सोशल मीडियावर शेअर केली आहेत. पण एखादा कलाकार जातो तेव्हा तो त्याच्या आठवणी, त्याची कला आपल्यासाठी मागे ठेऊन जातो. आणि एखाद्या कलाकाराला - गायकाला आपल्या कलेची सेवा करतानाच जर मृत्यू आला तर एक कलाकार म्हणून त्याचे किती भाग्य थोर असावे! त्याचे गायन क्षेत्रातलले योगदान हे खूप मोठे आहे. त्यामुळे आज जरी केके सारखा तारा आपल्यातून निखळला असला तरी तो त्याच्या कलेतून- त्याच्या गाण्यांतून ध्रुवताऱ्याप्रमाणे सर्वांच्या मनात अढळ आहे. शेवटी त्याला आदरांजली देताना एवढेच म्हणू ' हम रहे या ना रहे कल, याद आयेंगे ये पल ...'