एप्रिल महिनाअखेरीस बाणगंगा तलावात मासे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आले होते. या तलावात अकस्मात लाखो मासे मृत आढळले होते. या घटनेचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबईच्या मलबार हिल भागातील प्रसिद्ध अशा बाणगंगा तलावात मासे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आपण वाचले असेल. या तलावात अकस्मात लाखो मासे मृत आढळले होते. अनाकलनीय बाब म्हणजे, ही घटना घडण्याची वेळ. एप्रिलमध्ये घडलेली ही घटना विचित्र मानली जाते. कारण, या महिन्यात कोणताही सण नसतो. मात्र, बाणगंगा तलावात विशेषत: पितृपक्षादरम्यान दरवर्षी मासे मृत आढळून येतात. मग या एप्रिल महिन्यात असे काय घडले असावे, ज्याने लाखो मासे अकस्मात मृत्यू पावले?
बाणगंगा तलाव हा चारही बाजूंनी इमारतींनी वेढलेला आहे. अशा बंदिस्त तलावातील परिसंस्था या जैविक आणि अजैविक घटकांच्या समतोलावर अवलंबून असतात. तलावाचा परिसर अनेक पशुपक्षी, वनस्पती, तसेच माशांचा अधिवास आहे. हा बंदिस्त तलाव असून, या तलावाला अनेक मंदिरांनी व धर्मशाळांनी वेढलेले आहे. तलावास अनन्यसाधारण ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. भारतीय इतिहासातील कथेनुसार प्रभू श्रीराम लंकेस जात असताना त्यांना तहान लागली होती. तेव्हा त्यांनी या ठिकाणी जमिनीत बाण मारला, अशी आख्यायिका आहे व इथे पाण्याचा झरा निर्माण झाला. पण दुर्दैव असे की, या बाणगंगा तलावाचे पावित्र्य व शांतता इथे होणार्या प्रदूषणाने भंग होत असल्याचे दाखले अनेक आहेत.
बाणगंगा तलावाच्या आजूबाजूच्या जमिनीवर अतिक्रमण केले जात असून, लोक तलावात अंघोळ करताना दिसतात, घरातील कचरा, कपडे धुणे, भांडी इत्यादी गोष्टी तलावाच्या परिसरात आढळत आहे, असे एका लेखात नमूद केले होते. 2019 ते 2022 मध्ये मीदेखील तलावाच्या परिसरात अशा प्रकारच्या घटनांचे निरीक्षण केले आहे. याव्यतिरिक्त, मुख्य समस्या अशी की, बेकायदेशीर पद्धतीने मोठ्या प्रमाणावर सांडपाणी टाकीमध्ये जमा होत असल्याचे आढळते व त्यानेदेखील या तलावातील अधिवासांना आणि परिसंस्थेला हानी होत आहे. यामुळे जलचरांचे जीवन नष्ट होते.
या तलावाच्या काठी होणार्या धार्मिक कार्याने तळ्यात अनेक वस्तू व निर्माल्य टाकले जाते. तसेच याने होणार्या प्रदूषणाने व तलावात अतिरिक्त अन्न टाकल्यानेदेखील अनेक मासे मरण पावल्याचे प्राथमिक वृत्त आहे. माध्यमांमध्ये या तलावाची स्वच्छता राखण्यासाठी जनजागृतीचे उपाय करण्यात आल्याचे नमूद केले असले, तरीही अजूनही तलावाची परिस्थिती उत्तम नसल्याचे मी स्वत: माझ्या तलावाच्या परीक्षणात बघितले.
बाणगंगेभोवताली सुरू असलेल्या बांधकामामुळे तलावाचे पाणी गढूळ होत असल्याचे निदर्शनात आले. अधिकार्यांनी हे काम तात्पुरते थांबवून भू-तांत्रिक तपासणी केली आणि असे घडत आहे, याचा मागोवा घेतला. परंतु, 2020 ऑक्टोबर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात एक महिना उलटूनदेखील काहीही फरक न पडल्याचे सांगितले गेले आहे. इतकंच काय, तर पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने तलावाचे उगमस्थान ओळखण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून प्रदूषण थांबवता येईल. परंतु, 2021 साली, वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात असे नमूद केले गेले की, अजूनही बांधकाम थांबलेले नाही व तलावाची स्थिती सुधारली नाही.
डिसेंबर 2021 साली, ’प्रीथिव्या’ या ’जर्नल’ मध्ये ‘के. सी’ या महाविद्यालयाच्या ’जीवन-विज्ञान’ विभागातील विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केलेल्या लेखात बाणगंगा तलावाच्या पाण्यावर आधारित संशोधनाचे परिणाम मांडले आहेत. डॉ. सागरिका दामले यांच्या मार्गदर्शनाखालीया विद्यार्थ्यांनी असे संशोधनाद्वारे सिद्ध केले की, बाणगंगेचे पाणी ‘युट्रोफिक’ झालेले आहे. या शोधनिबंधासाठी केली निगरेल, आर्यमान तुळपुळे, निखिल थढाणी, डॉ. मयूरेश जोशी आणि डॉ. सागरिका दामले यांनी बाणगंगा टाकीच्या पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. हा निष्कर्ष पाण्याच्या रासायनिक परीक्षणाने व बाणगंगा तलावाच्या पाण्याच्या निरीक्षणाने मांडला आहे. याचा पुरावा तलावात ‘पॅचेस’मध्ये दिसणारे ‘अल्गल ब्लूम्स’ होय. या ‘युट्रोफिक’ पाण्यात मानव हस्तक्षेपाने अतिरिक्त पोषक तत्त्व आणि रासायनिक प्रदूषणाने ‘ऑक्सिडेटिव्ह’ घटकांची निर्मिती होते ज्याने पाण्यातील प्राणवायूची मागणी वाढते व प्राणवायूची पातळी कमी होऊ लागते. अलीकडच्या काळात तलावाभोवती होणार्या मानवी घडामोडींमुळे व मानवी हस्तक्षेपांमुळे हा र्हास होत असल्याचे समजते.
या लेखात पुढे नमूद केल्याप्रमाणे या ‘युट्रोफिक’ झालेल्या पाण्यात ‘हायपॉक्सिक झोन’ अर्थात, पाण्यात प्राणवायूची पातळी कमी असलेल्या जागा, निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त असते. या पाण्यात होणार्या बदलामुळे, या तलावात असलेल्या जलचरांना व पाणपक्ष्यांना धोका निर्माण होऊ शकतो, हे या निष्कर्षावरून यंदा लावणे शक्य आहे.
दुर्दैवाने काहीसे असेच 21 एप्रिल, 2022 रोजी झाले असू शकते. स्थानिक कंत्राटदाराच्या मते, अंदाजे तीन ते चार ट्रक भरून मेलेले मासे त्या दिवशी तळ्यातून काढले गेले. एप्रिलमध्ये इतके मासे मरण पावणे असे काही यापूर्वी घडले नव्हते. आम्ही पाण्याचे नमुने गोळा केले आहेत आणि पाण्यात काही रासायनिक घाण मिसळली आहे का, हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत, असे साहाय्यक महापालिका आयुक्त आणि ‘डी-वॉर्ड’चे प्रभारी प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. त्यांच्याही मते, टाकीच्या पाण्यात ऑक्सिजनची कमतरता हे मुख्य कारणांपैकी एक असावे, असे मानले जात आहे. परंतु, ठोस निष्कर्ष काढण्यासाठी सखोल अभ्यासाची गरज असल्याचे सगळेच मान्य करतात.
मुंबई महापालिकेव्यतिरिक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), मत्स्य विभाग आणि तारापोरवाला मत्स्यालयाच्या अधिकार्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यांचाही प्राथमिक निष्कर्ष हाच की टाकीच्या पाण्यात ऑक्सिजनची कमतरता हे मुख्य कारणांपैकी एक असू शकते. तथापि, हे कशामुळे झाले यावर पुढील अभ्यास करणे आवश्यक आहे, असे एका अधिकार्याने सांगितले.
मुद्दा इतकाच की, बाणगंगा तलावात जे घडले ते टाळता आले असते का? तब्बल दहा वर्षांपासून वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणारे लेख तलावाच्या परिस्थितीच्या अधोगतीचे प्रमाण आहेत. आपण, सुज्ञ नागरिक म्हणून काही करू शकलो असतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायची गरज आहे, असे मला वाटते.
- डॉ मयुरेश जोशी