
ठाणे : ’‘कोणाच्याही प्रभावात आणि प्रवाहात न येता लेखकाने स्वतंत्रपणे सत्याची कास धरून लिहित राहिले पाहिजे. साहित्यातही राजकारण होताना दिसत आहे त्यामुळे स्वतःच्या तत्त्वांशी आणि आदर्शांशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. कारण, आजच्या काळात ते सर्वांत कठीण आहे. त्यामुळे थेट आदर्शाकडे न जाता प्रथम स्वभावाकडे, व्यक्तिमत्त्वाकडे जा,” असे प्रतिपादन एस. एल. भैरप्पा यांनी, ‘आज सृजनशीलतेला किती वाव आहे’ या प्रश्नावर बोलताना केले. अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि समन्वय प्रतिष्ठान, ठाणे यांनी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘गप्पा भैरप्पांशी’ हा सुरस साहित्यिक मुक्त संवाद आयोजिला होता.हा सुसंवाद साधला सुप्रसिद्ध अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी. यावेळी डॉ. एस. एल. भैरप्पा बोलत होते.
कार्यक्रमात डॉ. उमा कुलकर्णी यांच्या डॉ. उमा रामराव यांनी केलेल्या ’संवादु अनुवादु’ या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ’तंतू’ या भैरप्पा यांच्या कादंबरीचे स्वरूप मोठे आहे, आधुनिक काळाचे महाभारत असलेल्या या कादंबरीचे साम्य तत्कालीन वास्तवाशी आहे का, याचे उत्तर देताना ते म्हणाले की, ’‘आपण लिहू शकतो की, नाही हे मला माहीत नव्हते. सृजनशीलता ही वेगळी बाब आहे. आधी आपल्याला जगता आले पाहिजे. आज बरेच चांगले बदल झाले आहेत, पण समोर येताना आधी वाईट गोष्टीच पुढे येतात आणि आम्हाला लेखनाची आयती सामग्री मिळते आणि ती मला मिळाली होती. आता कालांतराने आजच्या परिस्थितीवरदेखील अशीच ’तंतू’ कोणी लिहू शकते आणि भावना आणि नाते या विषयावर बोलतात, नात्याशिवाय भावना नाहीत आणि भावनेशिवाय लिखाण होऊच शकत नाही, ’रस’ महत्त्वाचा,” असे भैरप्पा म्हणाले. “आयुष्यातील महत्त्वाची मूल्ये रामायण-महाभारतआपल्याला शिकवत असतात. वाल्मिकी ऋषींनी २४ मूल्ये सांगितली. त्यातील एका मूल्यात म्हटले आहे, आपल्या देशात जन्मलेल्यानेच आपल्या देशावर राज्य करावे,” असे प्रतिपादन भैरप्पा यांनी केले.
“नवोदित लेखकांनी चांगले साहित्य वाचायला हवे, वाचनाच्या मुळाशी जायला हवे. महत्त्वाच्या कादंबर्यांचा अभ्यास करून त्यांचे तंत्र, मूल्य शिकायला हवे आणि आपल्या रामायण-महाभारत, कालिदासाचे वाचन केले पाहिजे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले. दरम्यान, “भैरप्पांचे साहित्य हे ओळींनी वाचता येत नाही ते तपशीलाने वाचावे, असे ते असते आणि भैरप्पांचे येथे असणे हा सरस्वतीने सरस्वतीचा केलेला सन्मान आहे आणि ज्ञानदेवांच्या पसायदानाचे सूत्र घेऊन सांस्कृतिक पालकत्व स्वीकारून या निमित्ताने पुढे जाण्याचा हा प्रवास आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद जोशी यांनी केले, तर यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, चित्रकार विजयराज बोधनकर, अरुण करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते.