‘अखिल महाराष्ट्र भाट समाजा’च्यावतीने संतनगरी शेगाव येथे भाट समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच संपन्न झाले.दि.२३ एप्रिल आणि रविवार, दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० पर्यंत दोन सत्रांत अधिवेशन पार पडले. त्या अधिवेशनासंदर्भात...
अखिल महाराष्ट्र भाट समाज राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच शेगाव येथे पार पडले. या अधिवेशनाचे प्रमुख अतिथी म्हणून दादासाहेब इदाते, अध्यक्ष, विमुक्त-घुमन्तु जनजाती विकास बोर्ड, नवी दिल्ली उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनव विद्येची देवता सरस्वती, तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून झाली. यावेळी संतोष शिंदे यांनी सरस्वतीस्तवन सादर केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला तसेच दादा इदाते यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. भाट समाजाचा भटक्या-विमुक्त जातीत समावेश व्हावा, असे निवेदन देण्यात आले. स्वागताध्यक्ष योगेश नवले यांनी राज्य अध्यक्ष विनायकराव सूर्यवंशी व बुलढाणा जिल्हाध्यक्ष विशाल नवले यांनी राज्य महासचिव अरविंद शिंदे यांचा सत्कार केला, तसेच दीपक साळवी राज्य संघटक, उपाध्यक्ष केशवराव दशमुखे, जनार्दन परिहार, राज्य सचिव अप्पाजी बाविस्कर, संजय भाट, राहुल चोपडे तसेच राष्ट्रीय पदाधिकारी सुधीर भाट, सुनील सूर्यवंशी अभिजित भाट, मधुकर पुजारी, उमेश खंडारे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
अधिवेशनासाठी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची स्वत: रेखाटलेली मोठी प्रतिमा उपलब्ध करून देणारे विलास शिंदे पेंटर, सुशीला लाडसे यांचाही सत्कार मुख्य अतिथींच्या हस्ते करण्यात आला. सत्कार समारंभानंतर राज्य महासचिव अरविंद शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात भाट समाजाचे एकत्रिकीकरण, समाजातील युवा-युवतींनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्याची गरज तसेच भाट समाज एक आदर्श समाज म्हणून नावारूपास यावा, यासंदर्भातले मनोगत व्यक्त केले. अधिवेशनाचे प्रमुख अतिथी दादा इदाते यांनी भाट समाज इतीहासात प्रमुख योगदान देणारा समाज होता. हा वंशावळ लेखनासाठी सदैव भटकंती करणारा समाज असून हा समाज घुमन्तु जाती प्रवर्गात येत असल्याने त्यांच्याकडून समाजास योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचा विश्वास दिला. यावेळी प्रमुख अतिथी यांचे हस्ते पुस्तकरुपात व ‘डिजिटल’ स्वरूपात स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.राज्य अध्यक्ष विनायकराव सूर्यवंशी यांनी भाट समाजाचे जीवनमान, व्यवसाय व परांपरा बघता हा समाज भटक्या-विमुक्त जातीमध्येच असणे गरजेचे होते. मात्र, हा समाज शासन दरबारी सदैव उपेक्षित राहिला. मात्र, आता हा समाज संघटित होत असून या समाजास योग्य न्याय मिळवून द्यावा, असे विविध उदाहरणासह प्रमुख अतिथी दादा इदाते यांना विनंतीवजा निवेदन दिले.
भोजन मध्यांतरानंतर युवा सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी, नागपूर यांनी समाज प्रबोधनपर सांगीतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात त्यांचे वडील व मोठे बंधू नितीन सूर्यवंशी व इतर टीमने साथ दिली. यानंतर मधुरा नितीन महादाने हिने अतिशय सुंदर व सुरेल असे सांगीतिक ‘गीत रामायण’ सादर केले. अधिवेशनाच्या द्वितीय सत्रात सर्व जिल्हा संघटन अध्यक्ष/उपाध्यक्ष यांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचा राज्य संघटनच्यावतीने सत्कार करण्यात आला, तसेच यावेळी सुनील सूर्यवंशी, सचिव नागपूर जिल्हा तथा राष्ट्रीय सदस्य, सुधीर भाट संघटक कोल्हापूर जिल्हा तथा राष्ट्रीय सदस्य, अप्पाजी बाविस्कर अध्यक्ष चंद्रपूर तथा राज्य उपाध्यक्ष अर्जुन पाचारणे अध्यक्ष मुंबई, विशाल नवले, अध्यक्ष बुलढाणा, गंगाधर चकोर, अध्यक्ष वर्धा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर मधुकर पुजारी, जयवंत पवार, गजानन जगताप, अरविंद काकडे, सुनील शिरसाट उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी दीपक साळवी, राज्य संघटक यांनी राज्य कार्यकारिणी रचना, अधिवेशनाचे नियोजन व विविध कार्यक्रम यावर आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार योगेश नवले, स्वागताध्यक्ष यांनी केले, तर अधिवेशनाचा शेवट स्नेहल बाविस्कर यांच्या वं.तुकडोजी महाराज रचित ‘राष्ट्रवंदने’द्वारे करण्यात आला. सदर अधिवेशनाला महाराष्ट्रातील 450 हून अधिक महिला-पुरुष समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या. यावेळी सभागृहात वंशावळ लेखक अर्जुनजी नवले यांनी वंशावळ पुस्तिकेसह उपस्थित राहून सविस्तर माहिती दिली. या अधिवेशनाच्या निमित्ताने महिलांचा स्नेह मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात दीडशेपेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या.