अहमदनगर : पवारांची सगळे नियम धाब्यावर आणि नोटीसा फक्त अहिल्या भक्तांसाठीच आहेत का? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केला आहे. कोणाच्या आदेशावरून हे सगळे सुरु आहे ? पवारांना आताच कशी चौंडी आठवली ? असा घणाघाती सवाल गोपीचंद पडळकरांनी केला आहे. आम्हा बहुजनांचा इतिहास पुसून टाकण्याचा राष्ट्रवादीचा हेतू आहे असा आरोपही पडळकरांनी केला आहे. राष्ट्रवादीने आमची श्रद्धास्थाने हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नये बहुजन समज तुम्हांला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असाही हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
आपण या कार्यक्रमासाठी २९ तारखेलाच पोलिसांना पत्र पाठवले होते. मग आपला कार्यक्रम टाळून पवारांच्या कार्यक्रमासाठी परवानगी कशी देण्यात आली? आणि आता आम्हांला दर्शनासाठी वेळा ठरवून देणारे पवार आहेत कोण? कुणाच्या आदेशावर पोलीस दल काम करतेय? याआधी कधीही राष्ट्रवादी काँग्रेसने इथे कार्यक्रम केल्याचे आठवत नाही मग आजच का आमच्या श्रद्धास्थानची आठवण पवारांना आणि त्यांच्या नातवाला झाली ? असा सवालही पडळकरांनी केला आहे.