ठाणे (प्रतिनिधी): मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या ‘अल्टिमेटम’नंतर आता ठाणे पोलीस ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहेत. मशिदींवरील भोंगे राज्य सरकारने काढले नाहीत, तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर आता मनसेच्या हालचालींवर ठाणे पोलीस लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 4 मे रोजी जर भोंगे उतरवले नाही, तर ठाणे जिल्ह्यातील मशिदींबाहेर दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचे पठण करण्यावर मनसे ठाम असून, संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाणे पोलीस अधिक सतर्क झाले असून मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा, ठाणे आणि औरंगाबादच्या सभेत मशिदींवरील भोंगे उतरवले गेले पाहिजे, असा सूर लावला. दरम्यान 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथील सभेत देखील 4 तारखेनंतर ऐकणार नाही, असे सांगत राज्यातील हिंदू बांधवांना तयारीत राहा, असे आदेश दिल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठण करण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ‘लाऊडस्पीकर’ हा विषय नवीन नसून हा धार्मिक नव्हे, तर सामाजिक विषय म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, असे राज यांनी स्पष्ट केले. मंगळवार, दि. 3 मे रोजी रमजान ईद असल्याने त्यात कोणतेही विघ्न आणणार नसल्याचे राज यांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र, 4 मे नंतर ऐकणार नाही, कार्यकर्त्यांनी पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा ही लागलीच पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले. दरम्यान, ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा येथील मशिदीबाहेर परवानगीदेखील मागितली असून, शहरातील अनेक ठिकाणच्या मशिदींजवळ असलेल्या स्थानिक पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.
भोंगे लावण्याची परवानगी मुंब्रा पोलिसांकडे मागितली
आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून मुंब्य्रातील जामा मशिदीसमोरच हनुमान चालीसा म्हणण्याचा इरादा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास 4 मे रोजी सकाळपासून हनुमान चालीसा पठण करण्यासाठी भोंगे लावण्याची परवानगी मुंब्रा पोलिसांकडे पत्राद्वारे मागितली आहे. सकाळी 6 वाजता, दुपारी 1 वाजता, सायंकाळी 5 आणि रात्री 8 वाजता हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
- अविनाश जाधव, ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष, मनसे
मशिदींवरील भोंगे आम्ही उतरवणार नाही; ‘मुस्लीम समाज ट्रस्ट’च्या बैठकीत निर्णय
कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे 3 मेपर्यंत उतरविण्याचा ‘अल्टिमेटम’ दिला होता. त्यावर कल्याणमधील मशिदींवरील भोंगे उतरवणार नसल्याचा निर्णय ‘मुस्लीम समाज ट्रस्ट’च्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.
‘मुस्लीम समाज ट्रस्ट’चे कासीफ तानकी यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाने 2005 साली दिलेल्या निर्णयात सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत भोंगे लावण्यास हरकत नाही असे म्हटले आहे. मात्र, त्यावर आवाजाची मर्यादा असावी. आवाजाची मर्यादा आम्ही पाळण्यास तयार आहोत. भोंगे उतरविण्याचा प्रश्नच उद्धवत नाही. कल्याण हे शहर शांततेचे प्रतीक आहे. रमजानच्या पवित्र दिवशी आम्ही शांतता ठेवण्याचे आवाहन करीत आहोत. रमजानचा पवित्र सण सगळ्यांनी एकत्र मिळून साजरा करावा.”