ठाणे कारागृहात आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरेंचा स्मृतिस्तंभ उभारणार

आ. निरंजन डावखरे यांचा पुढाकार

    03-May-2022
Total Views |
rb
ठाणे (प्रतिनिधी): आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्यापासून तरुणांना कायम प्रेरणा मिळत राहावी, यासाठी राघोजी भांगरे यांनी बलिदान दिलेल्या ठाणे कारागृहातील स्थळावर आमदार निधीतून स्मृतिस्तंभ उभारण्यात येईल, अशी माहिती आ. निरंजन डावखरे यांनी सोमवारी दिली. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या 174व्या बलिदानदिनी अखिल भारतीय वनवासी विकास परिषदेच्यावतीनेक्रांतिवीर राघोजी भांगरे चौकात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ठाणे मध्यवर्ती कारागृहात बलिदान दिलेल्या ठिकाणावर आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, माजी मंत्री मधुकरराव पिचड, भाजपचे मनपातील माजी गटनेते मनोहर डुंबरे, रामनाथ भोजणे, लक्ष्मण साबळे, दिलीप पटेकर, राम चव्हाण, दत्तात्रय सुपे आदींची उपस्थिती होती.
 
 
ठाणे कारागृहाबाहेर सद्यस्थितीतीलराघोजी भांगरेंचा पुतळा शहरातील महत्वाच्या भागात बसवावा. त्याचबरोबर केंद्र वा राज्य सरकारकडून निधी मिळवून ठाणे कारागृहात हुतात्म्यांना फाशी देण्यात आलेली जागा सुव्यवस्थित करावी, अशी मागणीही आ. डावखरे यांनी केली. क्रांतिवीर राघोजी भांगरेंनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान मोठे होते, अशी भावना पिचड यांनी व्यक्त केली, तर राघोजी भांगरे यांनी अत्यल्प साधने असताना उभारलेला स्वातंत्र्य लढा हा एक असामान्य होता, अशी प्रतिक्रिया आ. संजय केळकर यांनी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे राघोजी भांगरे यांच्या बलिदानदिनी अभिवादन कार्यक्रम पार पडला नव्हता. मात्र, कोरोना निर्बंध उठल्यामुळे अभिवादनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिकांनी गर्दी केली होती.