नवी दिल्ली : ’आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ अर्थात ‘आयएमएफ’ या जागतिक अर्थव्यवस्था आणि विकासदरांविषयी वेळोवेळी भाकीत वर्तविणार्या महत्त्वाच्या संस्थेने २०२९ पर्यंत भारत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करेल, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, ‘आयएमएफ’ने यासंदर्भातील आपली चूक मान्य करून २०२९ नव्हे, तर २०२७ सालीच भारत ही विक्रमी भरारी घेईल, असे नव्याने जाहीर केले आहे.
भारतात २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ८३.५७ अब्ज डॉलर्स इतकी विदेशी गुंतवणूक झाली आहे, जी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आधारस्तंभ ठरत आहे. ‘आयएमएफ’ने म्हटले आहे की, त्यांनी भारताच्या आर्थिक वाढीच्या गणनेतील चूक दुरुस्त केली असून, भारताचा विकासदर आधीच्या अंदाजापेक्षा जास्त राहणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराबाबत ‘आयएमएफ’ने म्हटले आहे की, आम्ही तयार केलेला अहवाल दुरुस्त करण्यात आला आहे. त्यात गणितीय चूक झाली होती. २०२९ पर्यंत भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज ‘आयएमएफ’ने यापूर्वी व्यक्त केला होता. आपला आधीचा अंदाज चुकीचा असल्याचे आता या संस्थेने मान्य केले आहे.
एका माहितीनुसार, ‘आयएमएफ’च्या कर्मचार्यांनी डेटा इनपुटसंबंधी त्रुटी शोधून काढली, ज्यामुळे भारताचे सकल देशाअंतर्गत उत्पादन (जीडीपी) डॉलर्समध्ये मोजण्यात त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या आता योग्य ते बदल करुन दूर करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होत आहे आणि मार्च २०२२ मध्ये भारताचा वास्तविक ‘जीडीपी’ महामारीपूर्वीच्या ‘जीडीपी’च्या समान पातळीवर पोहोचला आहे.